
मोझरीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. शरीर रक्त थुंकू लागलं तरी सरकार मात्र अजूनही मौन बाळगून आहे.
अमरावतीच्या मोझरी गावात सध्या इतिहास घडतोय. मात्र तो शौर्याचा नाही, तर अन्यायाविरोधात ‘शरीराच्या शेवटच्या थेंबापर्यंत’ चाललेल्या लढ्याचा. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आता त्यांच्या आरोग्यावर गडद सावल्या टाकू लागलंय. आंदोलनाचा सहावा दिवस उजाडला असताना कडू यांच्या प्रकृतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यांनी सकाळी रक्ताच्या उलट्या केल्या, तरीही त्यांनी उपचार घेण्यास ठाम नकार दिला आहे. सलाईनही नाही, औषधही नाही; मागण्या मान्य झाल्याशिवाय काहीही नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यविषयी गंभीर इशारा दिला आहे. उपाशीपोटी आंदोलन केल्याने किडनीसह शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होऊ लागलाय. रक्तदाब असंतुलित आहे, अशक्तपणा वाढला आहे, तरीही कडू उपचार नाकारत आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विनवण्या केल्या, तरीही हे केवळ माझं आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा आवाज आहे, असं म्हणत त्यांनी सलाईन लावण्यासही नकार दिला.

आंदोलनाचा गंभीर वळण
या आंदोलनाचं गांभीर्य इतकं वाढलं आहे की, बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने आणि सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रहार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. अजय चौधरी (वय 35), हे वरुड तालुक्याचे प्रहार संपर्कप्रमुख आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शिष्यवृत्ती, दिव्यांग व विधवा महिलांना मानधन, वंचित घटकांसाठी योजना, अशा अनेक मागण्या घेऊन बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळतोय. मंत्री भरत गोगावले, पंकजा मुंडे आणि जयकुमार गोरे यांनी ऑनलाईन बैठक घेतली, मात्र या चर्चेत ठोस आश्वासन दिलं गेलं नाही. त्यामुळे बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
बावनकुळे भेटीच्या तयारीत
राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यापूर्वी त्यांच्या आणि कडू यांच्यात फोनवर चर्चा झाली होती, मात्र वापरलेल्या भाषेवरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज प्रत्यक्ष भेटीत काही सकारात्मक निर्णय निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बच्चू कडूंशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. प्रश्न चर्चा करूनच सोडवले जातात. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर आणि दुकानदारांवर कठोर कारवाई होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.