
भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडाऱ्यातील युतीराजकारणावर थेट शब्दांत टोला लगावला. विकासकामांमुळेच कार्यकर्ते भाजपकडे ओढले जात आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
‘नेतृत्व हे मिळवायचं नसतं, सिद्ध करायचं असतं’, आणि हेच नेहमीच्या थेट आणि ठाम शैलीत पुन्हा एकदा दाखवलंय भाजप नेते माजी मंत्री, आमदार डॉ. परिणय फुके यांनी. भंडाऱ्यातील दुग्ध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उडालेल्या राजकीय धुरळ्याला त्यांनी एका सुसंगत आणि धडाडीच्या भूमिकेने उत्तर दिलं आहे. त्यांच्या या परखड विधानांनी विरोधकांची भुवया उंचावल्या असल्या, तरी भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवा उत्साह संचारला आहे.
डॉ. फुके यांनी भाजपच्या वाढत्या लोकप्रियतेकडे लक्ष वेधताना ठामपणे सांगितले, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचा भलामोठा महामार्ग सुरू आहे. त्याच रस्त्यावरून अनेक कार्यकर्ते भाजपात येत आहेत आणि ही लाट थांबणारी नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विकासाची दिशा अनुभवली आहे. हेच कारण आहे की सुधाकर बडगुजरसारखे दिग्गज कार्यकर्ते भाजपात सामील होत आहेत.

Shiv Sena : नवीन जिल्हा प्रमुख नियुक्तीचा मुहूर्त टळला; सर्वे करणार
राजकीय शस्त्रक्रिया
दुग्ध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर एकत्र आल्याने महायुतीच्या तत्वांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. यावरून डॉ. फुके यांनी अत्यंत थेट आणि स्पष्ट इशारा देत म्हटलं, भोंडेकर हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या पाठबळावर आमदार झाले. त्यांनी हे विसरू नये की कोणाच्या बळावर ते निवडून आले. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मिळालेल्या संधीचा योग्य वापर करण्याऐवजी परंपरागत विरोधकांसोबत जुळवून घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भोंडेकर यांच्यावर ताशेरे ओढताना डॉ. फुके म्हणाले, त्यांनी फार काही मोठं केलंय, असं नाही. कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होत आहे. काही कार्यकर्त्यांना पक्षातून निष्कासित केलं आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिथे जायचं असेल तिथे गेले, त्यांना रोखणं शक्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला कोणत्याही पक्षात जाण्याचा स्वातंत्र्य आहे. या विधानातून त्यांच्या आत्मविश्वासाचं स्पष्ट दर्शन होतं. कारण, डॉ. फुके हे पक्षासाठी निष्ठावान असूनही नेहमीच ‘नायक’सदृश वाटचाल करतात.
भविष्यातला नकाशा
काँग्रेसमध्ये कोणालाही भविष्य दिसत नाही, म्हणूनच लोक भाजपात येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो, कारण भाजप हे केवळ पक्ष नाही, तर विकासाचं एक चलतं-बोलतं यंत्र आहे, असं ठामपणे डॉ. फुके यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपमध्ये प्रवेश करणं म्हणजे देशाच्या विकास प्रक्रियेत भागीदार होणं. कार्यकर्त्यांचं भाजपकडे वाढतं झुकाव हेच त्याचं सर्वोत्तम उदाहरण.
डॉ. फुके यांनी नाना पटोले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची टक्कर झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी व भाजपने संपूर्ण ताकद लावून पटोलेंना अडचणीत आणलं होतं. डॉ. फुके यांच्या राजकीय डावपेचांनी विरोधकांची झोप उडवलेली होती. आता पुन्हा एकदा तेच चाणाक्ष नेतृत्व समोर आलं आहे.
डॉ. परिणय फुके हे एक असे नेते आहेत जे पक्षासाठी अखंड निष्ठावंत राहिले आणि आता पक्षाची उभारणी करणाऱ्या लढवय्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांच्या वकृत्वात धार आहे, विचारात स्पष्टता आहे आणि पक्षनिष्ठेमध्ये ठामपणा आहे. त्यांच्या भाष्याने एक गोष्ट नक्की झाली की, राजकारणात युती अनाकलनीय असली, तरी निष्ठावंत नेतृत्वाची ओळख ही नेहमी स्पष्ट, ठाम आणि प्रेरणादायकच असते.