
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांनी 2014 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मोठी मदत केल्याचा खळबळजनक आरोप केला.
भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या शिखरावर आरूढ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग अकरा वर्षे सुरू असलेल्या विकासयात्रेचा जयघोष सध्या संपूर्ण देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ऐकू येतो आहे. ‘विकास हेच उत्तर’ ही भाजपची घोषणा पुन्हा एकदा जनतेने स्वीकारली आहे. नरेंद्र मोदींचे नेतृत्व भाजपसाठी ‘विजयी मंत्र’ ठरत आहे. पंतप्रधानपदाची सलग तीन टर्म पूर्ण करणारे मोदी हे देशाच्या इतिहासात आपली स्वतंत्र छाप उमटवणारे पहिले नेता ठरले आहेत. या विजयाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मात्र टीका आणि आरोपांचे सत्रही थांबलेले नाही.
विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविषयी सध्या भाजपकडून आणि शिंदे गटाकडून आरोपांचे मोहोळ उठले आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांवर थेट आरोप करत म्हटले की, २०१४ मध्ये भाजप सरकार स्थापन होण्यात शरद पवार यांचा सिंहाचा नव्हे, तर ‘हत्तीचा वाटा’ होता. बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा खळबळजनक दावा केला. जाधव म्हणाले की, शरद पवार हे सध्या स्वतःला भाजपविरोधक म्हणून मांडत असले तरी, प्रत्यक्षात २०१४ साली त्यांनी भाजपला सरकार स्थापनेत मोठी मदत केली होती.

दुहेरी भूमिकेवर टीका
थेट मदत असो वा अप्रत्यक्ष, भाजप सत्तेवर येण्यामागे त्यांच्या सहकार्याची भूमिका मोठी होती. मात्र आता तेच भाजपचा विरोध करत आहेत, हे स्पष्टपणे ‘दुहेरी धोरण’ असल्याचे जाधव यांनी ठणकावून सांगितले.सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करायची आणि नंतर विरोधक म्हणून मिरवायचं हे दांभिकतेचे लक्षण आहे, अशी टीकाही प्रतापराव जाधव यांनी केली. शरद पवार हे सध्या आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपविरोधी भूमिकेत आहे. मात्र त्यांच्या मागच्या कृतींचा इतिहास विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.
ताज्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार गटात विलीन होण्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी पडदा टाकताना सांगितले होते की, भाजपसोबत संबंध ठेवणे हा काँग्रेस विचारधारेचा भाग नाही. भाजपसोबतची जवळीक ही काँग्रेस विचारांना मान्य नाही. त्यामुळे संधीसाधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देता येणार नाही, असे ते म्हणाले.याच पत्रकार परिषदेत प्रतापराव जाधव यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवरही निशाणा साधला. जर काँग्रेसचे नेते दारूच्या दरांबाबत कमी करण्याची मागणी करत असतील, तर मी स्वतः सरकारकडे त्यांचे निवेदन देण्यास तयार आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Harshwardhan Sapkal : किरीट सोमैय्या म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी
रायगड किल्ल्यावर झालेल्या पूजावादावर भाष्य करत जाधव म्हणाले, हिंदू धर्मात कोण कुठे पूजा करावी हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. यावरून राजकारण न करता, श्रद्धेला सन्मान दिला पाहिजे.