
चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात थेट तक्रार करत काँग्रेसच्या पराभवाचे खापर अंतर्गत गटबाजीवर फोडले.
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्या असल्या तरी त्याचे पडसाद अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत आहेत. सत्तेच्या समीकरणांनी गडबडलेल्या राजकीय आखाड्यात आता एक नवा सूर उमटतोय. तो म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीचा. या सुराची प्रमुख वादक ठरल्या आहेत चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर. धानोरकर यांनी नुकत्याच झालेल्या यवतमाळ येथील आढावा बैठकीत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना थेट लक्ष्य करत काँग्रेसच्या अडचणी उघड केल्या. सत्तेपासून दूर राहण्यामागचं खरं कारण म्हणजे हेच पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर पक्षविरोधी कामं करताना त्यांचा हात सुद्धा न कापणं, ही त्यांची तक्रार.
विशेष म्हणजे या तक्रारी त्यांनी चक्क बैठकीतच केल्या आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भात राजकीय खळबळ माजली आहे.आढावा बैठकीत प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षात काहीजण अनेक वर्षांपासून पदं घेऊन बसले आहेत. पण निवडणूक जवळ आल्या की त्यांचं मन भाजप किंवा शिवसेनेकडे झुकतं. यामुळे काँग्रेसची वाटचाल सावरण्याऐवजी अधिकच अडथळ्यांची होते. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट शब्दांत सांगितले अशा लोकांना तात्काळ पदमुक्त करा.इतकंच नाही, तर धानोरकर यांनी काँग्रेसमधील गटबाजी, उमेदवार निवडीतील दिरंगाई आणि निर्णय प्रक्रियेतील ढिसाळपणा यावरही ठाम शब्दांत टीका केली आहे.

नेतृत्वावर गंभीर प्रश्न
त्यांच्या मते, इतर पक्ष आपले उमेदवार वेळेत जाहीर करतात आणि तयारी सुरू करतात, पण काँग्रेसमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.धानोरकर यांच्या या फटकाऱ्याचे गांभीर्य इतकं आहे की, आता चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व या तक्रारीचे गांभीर्याने संज्ञान घेणार का? 2024 विधानसभेत विदर्भातील 62 जागांपैकी काँग्रेसने फक्त 8 जागा जिंकल्या. ही कामगिरी निश्चितच निराशाजनक होती. विदर्भ काँग्रेसमध्ये मरगळ पसरली आहे. धानोरकर यांचे आरोप हेच दाखवतात की आतूनच पक्ष उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची महाविकास आघाडीतून कामगिरी चांगली झाली होती. पण विधानसभा निवडणुकीत तीच ताकद गायब होती. याचा परिणाम म्हणजे काँग्रेस राज्यात सैरभैर झाली आहे. अनेक जुने कार्यकर्ते आणि नेते सत्ताधारी महायुतीकडे झुकू लागलेत. हीच गळती थांबवणं हे काँग्रेसपुढचे मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिभा धानोरकर यांची तक्रार अत्यंत महत्त्वाची ठरते. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर असताना ही घरभेदी वृत्ती थांबवण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली नाही, तर या पक्षाला अजून मोठा राजकीय फटका बसू शकतो. धानोरकर यांच्या ठणाण्याने काँग्रेसला आता जागं व्हावंच लागेल नाहीतर पक्षात घरचेच वाघ घर फोडतील.