
अमरावतीच्या मोझरी येथे बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफीसाठीचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या भूमीवर पुन्हा एकदा शिक्षक संघटनेचा आक्रमक मोर्चा उभारण्यात आला आहे.
अमरावतीच्या मोझरी येथून पेटलेली संघर्षाची ज्योत आता शहराच्या हृदयात धगधगत आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं शेतकरी कर्जमाफीसाठीचं अन्नत्याग आंदोलन जरी तात्पुरतं स्थगित झाले असले, तरी प्रहार जनशक्तीच्या लढ्याचा शिडकावा आता प्रहार शिक्षक संघटनेने उचलून धरलाय. शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचे हे तिसरे दिवस (18 जून). पण तीव्रता मात्र जणू लोकशाहीच्या कानठळ्या बसवणारी ठरत आहे. राज्य शासनाच्या ‘संच मान्यता’ या निर्णयाचा धिक्कार करत, आंदोलनकर्त्या शिक्षकांनी बुधवारी (18 जून रोजी) ‘शासन आदेशाची अंत्ययात्रा’ काढली.
प्रतीकात्मक अंत्ययात्रेचा संदेश स्पष्ट होता, शिक्षण व्यवस्थेतील अन्याय व विसंगतींचा अंत हवा. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह अकरा शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. घोषणांच्या गजरात चाललेल्या आंदोलनाने आयुक्त कार्यालयाचा परिसर थरथरवून टाकला. शासनाच्या दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या शिक्षकांनी स्पष्ट मागणी मांडली आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करावा. याशिवाय, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी एकूण 35 मागण्या संघटनेने सादर केल्या आहेत. शिक्षकांनी या आंदोलनात केवळ घोषणा देऊन नव्हे तर रक्तदान करूनही आपला रोष व्यक्त केला आहे.

रक्तदानातून व्यक्त रोष
दुसऱ्या दिवशी अमोल आगे, नागसेन रामटेके, अश्विन हिंगणकर यांसारख्या अनेकांनी रक्तदान करून आपल्या भावना स्पष्ट केल्या. प्रसंगी संघटनेने इशारा दिला की, जर प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही, तर 18 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल. या इशाऱ्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांशी थेट संपर्क साधत, शिक्षकांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमोर बैठक घेण्याची सूचना केली. आंदोलनाला एक नेतृत्व आहे महेश ठाकरे. पण या लढ्यात हजारो शिक्षकांचा आवाज सामील झालाय. आंदोलनात सहभागी झालेले चेहरे म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, ते शैक्षणिक न्यायासाठी झगडणारे योद्धे आहेत.
अमोल वन्हेकर, मंगेश टिकार, शरद सदाफळे, नीलेश रसे, संतोष गजभिये, सफिक खान आणि अशा शेकडो नावांमागे असलेली हजारो विद्यार्थ्यांची भविष्यं. बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन तात्काळ स्थगित झालं असलं तरी त्याची धार अजूनही मंदावलेली नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत पुन्हा एकदा पेटलेली प्रहार शिक्षक संघटनेची मशाल आता राजकारणात नव्या रंगांची उधळण करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या संघर्षाचं पडसाद केवळ शिक्षणव्यवस्थेपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा थेट प्रभाव आगामी महापालिका निवडणुकीवर आणि राज्याच्या राजकीय समीकरणांवरही पडण्याची शक्यता आहे.
Congress : हिंदीचा भाषिक बॅलेस्टिक, माय मराठीवर सांस्कृतिक स्ट्राईक