
गेल्या 11 वर्षांत जे घडलं ते फक्त ट्रेलर होतं, खरी फिल्म तर अजून सुरू व्हायची आहे, असं विधान करत नितीन गडकरींनी राजकीय रंगमंचावर उत्सुकता निर्माण केली आहे. 2029 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नव्या भूमिकेचीही चाहुल त्यांनी दिली आहे.
राजकारणाच्या रंगमंचावर मागील 11 वर्षे हा केवळ ट्रेलर होता, आता खरी कहाणी सुरू होणार आहे, असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2029 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नवा उत्साह निर्माण केला आहे. केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी एका खास मुलाखतीत आपल्या आगामी राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली आहे.
21 जून रोजी दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी गेल्या 11 वर्षांतील घडामोडी या केवळ न्यूज रील होत्या, खरी फिल्म आता सुरू होणार आहे, असं स्फोटक विधान करत 2029 मधील लोकसभा निवडणूक ही आपली नवी इनिंग असल्याचं संकेत दिला. ते पुढे म्हणाले, माझं राजकारण कधीही स्वतःचं बायोडेटा छापून किंवा विमानतळांवर स्वागताची नाटकी दृश्यं उभी करून झालेलं नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी मनापासून पार पाडेन.

Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?
हिंदुत्व एक जीवनशैली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं, हिंदुत्व हे कोणत्याही राजकारणाचं साधन नाही, तर ती एक जीवनशैली आहे. सुप्रीम कोर्टानेही याला मान्यता दिली आहे. येणाऱ्या काळात ‘भारतीयत्व’ आणि ‘राष्ट्रीय ओळख’ म्हणजेच हिंदुत्व असं समीकरण तयार होणार आहे. हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाही आणि ते कोणत्याही विशिष्ट पूजा-पद्धतीशी जोडलेलंही नाही. गडकरींच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात आणि वैचारिक चर्चांमध्ये हिंदुत्वाची व्याख्या नव्या दृष्टिकोनातून पुढे आली आहे.
काम करणं वैयक्तिक ध्येय
गडकरी यांनी अत्यंत भावनिक शब्दांत विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी स्वतःच्या स्तरावर अधिक प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली. “आज मी केवळ रस्त्यांच्या कामांपुरतेच मर्यादित नाही, मी शेती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अधिक गुंतलो आहे, असं सांगत त्यांनी आपल्या मनात असलेली ग्रामीण आणि शाश्वत विकासाची बांधिलकी अधोरेखित केली.
प्रति व्यक्ति उत्पन्नाच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट सांगितले की भारताची लोकसंख्या वाढ हे या मागचं प्रमुख कारण आहे. त्यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा ठाम पाठिंबा देताना म्हटलं, हा धार्मिक किंवा भाषिक मुद्दा नसून पूर्णपणे आर्थिक आहे. विकास झपाट्याने होत असताना परिणाम का दिसत नाहीत, त्यामागे वाढती लोकसंख्या हीच मुख्य अडचण आहे.
यशाला दिली दाद
गडकरी यांनी 2014 पासूनच्या मोदी सरकारच्या प्रगतीचा आढावा घेत अनेक क्षेत्रांतील विकास कार्यांचे उल्लेख केले. ते म्हणाले, देशात एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, लाखो किलोमीटर रस्ते बांधले गेले, जलसंपदा, ऊर्जा, बंदर, आणि लॉजिस्टिक्समध्ये क्रांती झाली, हे सर्व विकासाचे स्तंभ आहेत. गडकरी यांची खासियत म्हणजे विकासाच्या दोन टोकांवर ते सहज फिरतात. एकीकडे महामार्ग, पूल, आणि गगनचुंबी योजनांचा रोमहर्षक वेग, आणि दुसरीकडे शेती, ग्रामविकास, पाणीबचत, जैविक शेतीसारख्या मूळ प्रश्नांवर अत्यंत प्रामाणिक दृष्टिकोन.
गडकरी पुढे म्हणाले, मी निवडणूक लढवणार की नाही हे महत्त्वाचं नाही, पण पक्षाची जी भूमिका असेल, ती मी निभावणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत पुढील राजकीय वाटचालीचं संकेत दिलं. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा विदर्भासह देशभरात चर्चेला उधाण आलं आहे. नितीन गडकरी यांचं जीवन हे केवळ रस्ते बांधणाऱ्या मंत्र्याचं नव्हे तर दिशादर्शक विचारवंताचं आहे. ते केवळ विकासाचे इंजिन चालवत नाहीत, तर आशेच्या रेषाही आखतात. त्यांची ‘न्यूज रील’ संपली असून, आता ‘खरी फिल्म’ सुरू होणार असल्याने सर्वांच्या नजरा या ‘डायरेक्टर’कडे लागल्या आहेत.