संपादकीय/लेख/विश्लेषण

Nagpur Police : व्यसनमुक्त समाजासाठी निर्धार

Operation Thunder 2025 : ड्रग्जच्या अंधारावर जनजागृतीचा प्रकाश

Author

नागपूरमध्ये 20 ते 26 जून 2025 दरम्यान ऑपरेशन थंडर 2025 अंतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती आठवडा राबविण्यात आला. त्याबाबत नागपूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी शिवाजी राठोड यांचा खास लेख.

(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही.)

नागपूर शहरात 20 ते 26 जून 2025 कालावधीत सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर 2025 अंतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती आठवडा एक व्यापक आणि प्रभावी उपक्रम ठरत आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सजगता निर्माण करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. या आठवड्यात फक्त माहिती दिली जात नाही, तर सहभागी होण्यासाठी विविध स्पर्धा रील, पोस्टर, निबंध लेखन, आणि खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर होणारे नाट्यप्रयोग, अ‍ॅम्बेसेडर जनजागृती, ऐक्य रॅली आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचे सत्र या उपक्रमांना अधिक जीवन्त बनवतात.

अंमली पदार्थांची जप्ती करून त्यांचा नाश करण्याचा ठोस प्रयत्नही सुरू आहे. कुर्ट कोबेनचं एक प्रसिद्ध विधान आहे ‘Drugs waste your time, memory, self-respect and everything else.’ हे केवळ वाक्य नसून, व्यसनाचं मूलभूत सत्य सांगते. मेरिअम वेबस्टरच्या मते, व्यसन ही अशी जबरदस्त ओढ असते, जी व्यक्तीला सतत तेच वर्तन पुन्हा पुन्हा करण्यास भाग पाडते, जरी त्याचे दुष्परिणाम स्पष्ट असले तरीही. डोपामिनचं क्षणिक समाधान देणारे पदार्थ मेंदूला कृत्रिम आनंद देतात. पण याचे दूरगामी परिणाम अत्यंत धोकादायक असतात. व्यसनाधीन व्यक्ती फक्त स्वतःला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांमध्ये ओढते.

Ashish Deshmukh : महाराष्ट्रात शिक्षणाच्या मॉडेलद्वारे सकारात्मक बदल

पालकांचा सहभाग वाढला

पोलीस तपासणीदरम्यान उघड झालेलं एक वास्तव धक्कादायक आहे. अनेक गुन्हेगारांनी लहानशा चोरीपासून सुरुवात केली, केवळ व्यसनासाठी पैसे उभारण्यासाठी. जसजशी गरज वाढली, तसतशी त्यांनी खून, दरोडे, कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारासारखे गंभीर गुन्हे केले. सर्वात वाईट बाब म्हणजे अशा तरुणांचे त्यांच्या पालकांशी असलेले संबंध तुटले. ते रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा ठिकाणी राहू लागले, टोळक्यांमध्ये सामील झाले आणि गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला. जनजागृती हीच या लढ्याची खरी ताकद आहे. मोहल्ला समित्या, शांतता समित्या, शाळा, महाविद्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणारी बैठक समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत.

एनजीओ आणि खासगी संस्थांच्या सहभागामुळे रस्त्यावर होणाऱ्या नाट्यप्रयोगांना नवसंजीवनी मिळाली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जेव्हा पालकांना पोलिसांचे उद्दिष्ट आणि त्यामागची संवेदना समजली, तेव्हा त्यांनी देखील सहभाग वाढवला. कारण मूल एकदा व्यसनाधीन झालं की ते फक्त पदार्थांपासूनच नाही, तर आपल्या माणसांपासूनही तुटतं. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. व्यसन म्हणजे आजार. ती शारीरिकच नाही तर मानसिक गुंतागुंत आहे. जितक्या लवकर उपचार सुरू होतात, तितक्या लवकर नुकसान कमी करता येते. म्हणूनच पोलिसांनी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन व्यसनमुक्तीसाठी बहुआयामी उपाययोजना आखल्या आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाने शाळा, शिक्षक, डॉक्टर, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक एकत्र येऊन हा लढा देणं अत्यावश्यक आहे. फक्त अटक करून नव्हे, तर व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनाद्वारेच खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!