
माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटलं की, जर ते खरे रामभक्त असतील तर भाजपच्या कुठल्याही नेत्यावर आजपर्यंत ईडीची कारवाई का झाली नाही हे सांगावं.
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपची वागणूक आणीबाणीपेक्षा वाईट आहे, हे देशाला ठाऊक आहे. जर हे लोक खरे रामभक्त असतील तर आजवर भाजपच्या एका तरी नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? याचे उत्तर द्या असा रोखठोक सवाल त्यांनी सरकारला केला आहे. सरकारचा खर्च वाचवणारी अंदाज समितीसुद्धा आता स्वतःच्या ऐशआरामात मग्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. चक्क विधिमंडळातील समितीच्या दोन दिवसांच्या जेवणासाठी चांदीच्या थाळ्या वापरून लाखोंचा खर्च केला गेला असल्याचे त्यांनी उघड केले. यातून सरकारची संवेदनाशून्य वृत्तीच दिसून येते, असे बच्चू कडू म्हणाले.
राज्य सरकारमध्ये सध्या बसलेले लोक अत्यंत भावनाहीन आहेत. त्यांना ना शेतकऱ्यांची काळजी, ना गरिबांची फिकीर, अशी टीका करत बच्चू कडू म्हणाले, दररोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. हे सरकार मात्र लाखोंच्या उधळपट्टीत व्यस्त आहे. एका बाजूला म्हणायचं सरकारकडे पैसे नाहीत. दुसऱ्या बाजूला चांदीच्या ताटात जेवायचं याला काय म्हणावं? हे पाहून सामान्य नागरिकांच्या मनात काय संताप असेल याचा विचार तरी करा, अशी सडकून टीका त्यांनी केली. भाजपला सवाल करत बच्चू कडू म्हणाले, तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का?

Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक
धर्माची ढाल वापरली
भाजपच्या कुठल्याही नेत्यावर ईडीची चौकशी का नाही? ज्या प्रकारे जनतेची आर्थिक कत्तल सुरू आहे. त्याला कसाईगिरी म्हणायला हरकत नाही. कसायासारखं एक दिवस गायीला चारा टाकायचा आणि रोज तीच कापायची, हे सरकार वेगळं काय करतं रामाचे खरे भक्त असल्याचं म्हणता, पण भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर लपवायला धर्माची ढाल बनवताय, असे कडवट शब्द त्यांनी भाजपच्या दिशेने सोडले. आपल्याला पदाची लालसा नाही हे स्पष्ट करत बच्चू कडू म्हणाले, लोक म्हणतात बच्चू कडूच्या मनात पदाची हाव आहे. पण मी स्पष्ट सांगतो आमदारकी गेली, अध्यक्षपद गेलं तरी मी थांबणार नाही.
Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’
माझी जेलवारी झाली तरी मी लढत राहणार. माझ्या अपात्रतेची फाईल एका महिन्यापासून कुठे फिरत आहे. अजूनही मला नोटीस मिळालेली नाही. हा सर्व प्रकार मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. भाजपमधील काही लोक बँक तोट्यात असल्याच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप करत बच्चू कडू म्हणाले, संचालकांनी बँकेची बदनामी थांबवावी. काही जणांना वाटतं की मी मुख्यमंत्र्यांना फोन करून कॉम्प्रोमाईज करीन. पण हे स्वप्नातही शक्य नाही. माझ्या नावातच ‘कडू’ आहे. त्यामुळे कुणाही समोर मी गोड होणार नाही, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली.