राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतची चर्चा तापू लागली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात पक्षनेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. अशा वेळी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीखही चर्चेचा विषय बनली आहे. येत्या 8 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूरात हे अधिवेशन सुरू होणार होते, पण आता ते पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत अधिवेशनाला ब्रेक लागणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरात घेणे बंधनकारक आहे.
हिवाळी अधिवेशन नेहमीच येथे आयोजित केले जाते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 31 जानेवारी 2026 पूर्वी नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे. एकाच वेळी सर्व निवडणूक घेणे अशक्य असल्याने निवडणूक आयोग तीन टप्प्यात मतदान घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे अधिवेशनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी यंत्रणा व्यस्त राहील. त्यामुळे अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाऊ शकते. अधिवेशन पुढे ढकलण्याचे कारण फक्त निवडणूक नव्हे, तर ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनानेही संकट निर्माण झाले आहे.
दीडशे कोटींची थकबाकी
नागपूरातील मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती आणि इतर कामे प्रलंबित आहेत. तब्बल 150 कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांनी काम बंद केले आहे. यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरात घेणे कठीण होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. काहींनी तर मुंबईत अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. पण नागपूर कराराच्या बंधनामुळे हे शक्य नाही. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच अधिवेशन घेता येईल, असा विचार सुरू आहे.
अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. विधिमंडळ सचिवालय मात्र ठरलेल्या वेळेनुसार तयारी करत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिवेशन वेळेत होईल की पुढे ढकलले जाईल, याबाबत उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी अधिवेशन आठ-दहा दिवस लवकर घेण्याचीही चर्चा होती. पण आता पुढे ढकलण्याकडेच कल दिसतो आहे. बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि यंत्रणा निवडणूक कामात गुंतली जाईल. त्यामुळे अधिवेशन ठरल्याप्रमाणे 8 डिसेंबरला सुरू होणे कठीण आहे. एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
