
Views: 8800
राज्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करीनं डोकं वर काढलं आहे. गुटखा, पान-मसाला आणि सुपारीचीही तस्करी केली जात आहे. अशात भाजप आमदार आशिष देशमुख यांनी शुक्रवारी असाच एक साठा पकडला.
वाळू तस्करांवर लगाम कसण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अधिकाऱ्यांसोबत भाजपचे आमदारही तस्करांना पकडण्यासाठी आता पुढे सरसावले आहेत. भाजपचे सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांना मध्य प्रदेशातून सावळी मार्गाने सातत्याने वाळू तस्करी केली जाते. गुटखा तयार करण्यासाठी सडकी सुपारी नेली जाते. तंबाखूसह इतरही अनेक प्रतिबंधित वस्तूंची अवैध वाहतूक सातत्याने केली जात होती. यासंदर्भातील माहिती आमदार डॉ. आशिष देशमुख यांना मिळाली. त्यामुळं त्यांनी शुक्रवारी (03 डिसेंबर) रात्री छापा घातला.

नागपूर जिल्ह्यातील केळवद परिसरात आमदार देशमुख यांनी छापा घातला. या छाप्यात त्यांनी वाळू आणि सुपारी तस्करांची वाहनं पकडली. डॉ. देशमुख यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मिळून शुक्रवारी रात्रीला अचानक या मार्गावरील केळवद परिसरात संशयास्पदरित्या जाणारे ट्रक अडवले. त्यानंतर त्यांनी या ट्रक्सची तपासणी केली. आमदार देशमुख यांनी स्वत: वाहनांची तपासणी केली. त्यात वाळू आणि सुपारी असल्याचं आढळलं. याशिवाय आणखी प्रतिबंधित साहित्य देखील आढळलं. त्यानंतर आमदार देशमुख यांनी तातडीनं पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती दिली.
तातडीनं Action
आमदार देशमुख यांच्या सूचनेनंतर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली. या कारवाईनंतर आमदार देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मध्य प्रदेशमधून सावळी मार्गाने अवैध वाहतूक होत असल्याचं ते म्हणाले. रॉयल्टी चोरली जात आहे. ओव्हरलोड ट्रक चालविण्यात येत आहेत. टोल वाचवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. या प्रकारातून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचंही देशमुख म्हणाले. अवैध वाहतुकीमुळं ग्रामीण भागातील रस्तेसुद्धा खड्डेमय झाले आहेत. अपघातांची संख्या देखील वाढली आहे.
अपघातांमुळं स्थानिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तस्कारांच्या टोळीचे कृत्य पुढे आणण्यासाठी आपल्याला छापा घालावा लागला. तस्करांच्या टोळ्यांची सगळी माहिती पुढे आणावी अशी सूचना पोलिसांना केल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. सडक्या सुपारीची वाहतूक देखील वाढली आहे. यामुळं सामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. राज्यात तंबाखू, गुटखासह पान मसाला तस्करी केली जात आहे. या सगळ्यांच्या विक्री आणि उत्पादनावर महाराष्ट्रात बंदी आहे. त्यामुळं अमलीपदार्थांचीही तस्करी केली जात असल्याची टीका आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. ओव्हरलोड ट्रकमध्ये आक्षेपार्ह साहित्य नेण्यात येत असल्याचंही देशमुख म्हणाले.