
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी दावा केला की, काही दिवसांत वाल्मिक कराड भाजपमध्ये सामील होतील.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि इतर राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आज निर्णय होईल, अशी चर्चा असताना संजय राऊत यांनी सांगितले की, धनंजय मुंडेंवर कोणताही निर्णय होणार नाही. उलट, काही दिवसांत वाल्मिक कराड हे भाजपमध्ये सामील होतील.

संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर आरोप केले की, वाल्मिक कराड सध्या इस्पितळात आहेत. त्यांच्या उपचारांसाठी इस्पितळाचा एक मजला पूर्णतः रिकामा ठेवण्यात आला आहे. “त्यांना इतर अनेक खास सवलती मिळत आहेत, पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात येत नाही का?” असा सवाल करत राऊत यांनी प्रशासनावर थेट टीका केली.
सुरेश धसबाबत प्रश्न
बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या दहशतवादविरोधी चळवळीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही टीका केली. “हे तांडव शासकीय आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही. सगळं काही धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचा आरोप धस करत आहेत. पण खरे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत,” असे राऊत म्हणाले.
अंजली दमानिया यांनीही याप्रकरणात आपला हस्तक्षेप केला आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “अंजली दमानिया यांचा भाजपशी किंवा संघ परिवाराशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय होणार नाही.”
भाजपमध्ये जाणार ?
संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव वारंवार समोर येत आहे. एसआयटीच्या तपासानुसार, विष्णू चाटेने सुनील शिंदे यांना कॉल करून वाल्मिक कराडशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याने हे सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे वाल्मिक कराड दोषी ठरतो का, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल चर्चेचा भडका उडाला आहे.
संजय राऊत यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी दावा केला की, काही दिवसांत वाल्मिक कराड हे भाजपमध्ये सामील होतील. सुरेश धस यांचे विधानही त्याच दिशेने इशारा करत आहे. या वक्तव्यामुळे बीडमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मल्लीकार्जुन खर्गे यांच्या विधानाचा Parinay Fuke यांनी घेतला समाचार
मुंबईतून बोलणे योग्य नाही
राऊत यांनी सांगितले की, बीडमधील परिस्थितीवर आम्ही मुंबईतून बोलणे योग्य नाही, कारण तिथे काय घडतंय याची सर्व माहिती सुरेश धस यांना आहे. त्यांनी सूचक विधान करताना सरकार पक्षाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमुळे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि भाजप यांच्याभोवतीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वाल्मीक कराड हे भाजपच्या गटात बसतील, या विधानामुळे आगामी काळात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.