
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसनं बाजी मारली आहे. त्यानंतर आता 7 फेब्रुवारीला विषय समिती सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे.
अध्यक्षपदानंतर भंडारा जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अत्यंत रंजक आणि चूरसपूर्ण होणार आहे. हातात असलेलं अध्यक्षपद भाजपला साधता आलं नाही. काँग्रेसनं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलं. आता विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी देखील चूरस सुरू झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडी सुरू आहे. अशातच महायुतीमधील पाच सदस्य अचानक ‘मिस्टर इंडिया’ झाले आहेत. हे पाचही सदस्य कुठे गायब झालेत, याचा शोध महायुतीमधील नेते घेत आहे. या पाच जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपच्या एका सदस्याचा समावेश आहे. निवडणूक असल्यानं आपल्यावर लक्ष्मीकृपा व्हावी, म्हणून तर हे सदस्य गायब झाले नाहीत ना? अशी चर्चा आता होत आहे.
अत्यंत महत्वाच्या असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत एकूण 52 आहेत. अध्यक्ष पदाच्या दावेदार होत्या त्या माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. नेवारे या भाजपच्या नेत्या आहेत. त्यामुळं आता जिल्हा परिषदेत संख्याबळ 51 झालं आहे. या 51 सदस्यांना विषय समित्यांचे सभापती निवडायचे आहेत. शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहेत. अशात महायुतीच्या पाचही सदस्यांनी त्यांच्या हातावर असलेल्या ‘घड्याळी’चं असं कोणतं बटण दाबलं की ते ‘मिस्टर इंडिया’ झालेत, हे कळेनासं झालं आहे.

माजी गृहराज्यमंत्र्याच्या गावात Pankaj Bhoyar यांची पहिली भेट
सामना बरोबरीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपचा एक सदस्य गायब झाल्यानंतर महायुतीचं संख्याबळ 24 झालं आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसकडं 21 सदस्य आहेत. त्यामुळे गायब झालेल्या पाच सदस्यांवर सगळं काही अवलंबून आहे. हे पाच सदस्य गायब झाले, त्यांना एका आमदारानं मदत केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना खास गाडी करून देण्यात आली होती. या पाचही सदस्यांना कुठे ठेवायचं याचा ‘वास’ या आमदाराच्या एका विश्वासू सहकाऱ्यानं घेतला. ऋतुमानाच्या देवतेला पुराणांमध्ये ‘रीतेश’ असं म्हटलं जातं. जिल्हा परिषदेतील पाचही सदस्यांना गायब केल्यानंतर राजकीय ऋतुमान बिघणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली. सगळं काही ‘कंट्रोल’मध्ये राहिल याची खात्री पटल्यानंतर पाचही सदस्यांना घेऊन गेलेली गाडी एका ठिकाणी थांबली. सध्या हे सगळे सदस्य ‘ईश्वरा’च्या छत्रछायेखाली आहेत.
गायब झालेले पाचही सदस्य सध्या एका सुरक्षित ठिकाणी मुक्कामी आहेत. अखेरच्या क्षणी ते अवतरणार आहेत. सध्या त्यांच्यावतीनं अनेक पातळ्यांवर बोलणी सुरू आहे. निवडणुकीच्या काही तास पूर्वी गायब झालेले पाचही जण येतील याची गॅरंटी घेतली जात आहे. भंडारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद काँग्रेसकडं आहे. उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडलं आहे. अशात विषय समिती सभापती आपले व्हावेत, याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजप दोघेही करीत आहेत. यात कोणाला यश मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक वजदार राजकीय नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा हा गृहजिल्हा आहे. भाजपचे वजनदार नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांची भंडारा ‘होमपीच’ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे हे देखील भंडाऱ्याचेच. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चरण वाघमारे यांचीही जिल्ह्या मजबूत पकड आहे. अशात जिल्हा परिषदेतून महायुतीचे पाच सदस्य गायब होणं सगळ्यांसाठी धक्कादाक आहे. परिणामी भंडारा जिल्हा परिषद महायुतीच्या हातून निसटणार का? याची चिंता आता अनेकांना आहे.