
राज्यात सत्ता उलथवून टाकणाऱ्या महायुतीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भंडाऱ्यात चिमवले आहे. बोटावर मोजण्याइतके सदस्यही महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीत सांभाळता येऊ शकले नाहीत.
सत्ता उलथवून टाकणाऱ्या महायुतीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि त्यांच्या छाव्यांनी धूळ चारली आहे. नाना पटोले यांची ‘होमपीच’ असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत पटोलेंनी असा यशस्वी षटकार ठोकला की, अनेकांना आता तोंड दाखवलायही जागा राहिलेली नाही. लाखांदूरच्या शंकरपटात नानांनी आपले जुने मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची गळाभेट घेतली. लाखांदूरमध्ये एकत्र आलेल्या या सर्जाराज्याच्या जोडीनं काय समीकरणं जुळविली कोणास ठाऊक भंडारा जिल्हा परिषदेचा तख्ताच पलटवून टाकला. मात्र या साऱ्यात खरे हिरो ठरले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि त्यांचे छावा. अर्थात काँग्रेसमध्ये येण्यापूर्वीच्या छावा संग्राम संघटनेतील जुने युवा सहकारी.
काँग्रेसच्या कविता उईके यांनी पक्षाचा ‘हात’ सोडून दुसरा रस्ता धरण्याचा प्रयत्न केला. परंतु ही देखील नाना पटोले यांची खेळी असावी असं आता बोललं जात आहे. त्यामुळं जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर काँग्रेसला ताबा मिळविता आला. त्यानंतर नाना पटोले आणि त्यांच्या छाव्यांनी एकजूट काय असते हे सगळ्यांना दाखवून दिलं. महायुतीमधील ‘घड्याळी’चे काटे पटोले यांनी असे काही फिरविले की, पाच सदस्य फुटले. एकाएकी हे सदस्य गायब झालेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आणि भाजपच्या एका सदस्याचा समावेश होता. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ 21 आहे. भाजपचे 13 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या 16 आहे.

मूठभर लोकही ऐकेना
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचे हौसले खुपच बुलंद आहेत. राज्यातील एकूण राजकीय चित्र बदललं आहे. त्यामुळं भंडारा जिल्हा परिषदेत महायुती अगदी चुटकी वाजविण्यासारखी सत्ता मिळवेल असं अनेकांना वाटत होतं. पण पटोले यांनी अखेरच्या ‘ओव्हर’मध्ये सगळा ‘गेम’च पलटविला. अख्खी तरूणाई नागपुरातील जामठा येथे सुरू असलेला भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना पाहण्यात व्यस्त होती. अशात नानांच्या छावा संघटनेचे पदाधिकारी तिकडे भंडाऱ्यातील सामना जिंकण्यासाठी जीवतोड ‘फिल्डिंग’ करीत होते. विशेषत: नानांचे विश्वासू सहकारी गणेश ठवकर यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मूठभर सदस्यही सांभाळता न आल्यानं महायुतीच्या तंबुत घबराहट सुटली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद हातातून निसटले होते. आता विषय समिती सभापतिपदही गेलं तर अख्खी जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात जाईल, हे महायुतीच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी ‘मॅच फिक्सिंग’ करण्याचा निर्णय घेतला. ज्या ‘गणेश’वर नानांचा विश्वास होता. त्यालाच काँग्रेसच्या यशात विघ्न आणण्यासाठी बळीचा बकरा करायचा, असं ठरलं. महायुतीची ही ‘गुगली’ यशस्वी ठरली असती तर गणेश ठवकर आणि नाना पटोले असे एकाचवेळी दोघांना ‘आऊट’ करता येणार होतं. पण नानांच्या छाव्यानं फितुरी करण्यास नकार दिला. नाना पटोले यांच्या प्रती गणेशानं ‘वफादारी’ सिद्ध करण्याची हिच ती वेळ, हाच तो क्षण हे ओळखलं. त्यामुळं नानांना यंदा महायुतीचं अचूक ‘ऑपरेशन’ करणं शक्य झालं.
एकीकडं नागपुरात भारत विरुद्ध इग्लंड असा सामना रंगत होता. दुसरीकडं भंडाऱ्यात राजकीय मॅच चूरसपूर्ण ठरत होती. एक एक चेंडू नागपुरातील जामठा स्टेडीयमवर पडत असताना युवा क्रिकेट चाहत्यांच्या ‘दिल की धडकन’ वाढत होती. पण भारताचे खेळाडू ‘जी जान’ प्रयत्न करीत होते. अगदी तशीच टाइट ‘फिल्डिंग’ ‘भारत जोडो’ यात्रा घेऊन काही महिन्यांपूर्वी पायपीट करणाऱ्या राहुल गांधी अन् नाना पटोले यांचे छावा भंडाऱ्यात करीत होते. इकडे नागपुरातील जामठ्यावर भारतानं विजय मिळवित तिरंगा फडकविला अन् तिकडे नानांच्या छाव्यांनी महायुतीला चित करीत झेडपीवर काँग्रेसचा तिरंगा रोवला.