महाराष्ट्र

कुणीच तयार नव्हते म्हणून Congress पक्षाला शोधावा लागला बळीचा बकरा 

महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची टीका; Vijay Wadettiwar यांचा पलटवार 

Author

राज्यात काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा टीकांचा वर्षाव होत आहे. 

काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अंतिम क्षणी वेगळेच नाव समोर आल्याने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावत टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील दहा नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे चित्र होते. मात्र, निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर यापैकी एकानेही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयारी दाखवली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

कोट्यवधीची रोकड District Bank मधील तिजोरीत

नेतृत्वाची उणीव स्पष्ट

प्रदेशाध्यक्ष कोण होणार, हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय असला तरीही दहा प्रमुख नेत्यांनी जबाबदारी स्वीकारली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास कोणीही इच्छुक नाही. त्यामुळे बळीचा बकरा शोधण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच मंत्रिमंडळ आणि खातेवाटप ठरवले होते. मात्र, प्रत्यक्षात सत्ता दूर राहिल्याने आता पक्षात नेतृत्वाची वानवा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळतीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

कामचुकार RTO Officer वर होणार कडक कारवाई

महाविकास आघाडी अविचारी

महाविकास आघाडीचा अजेंडा विकासासाठी नव्हे केवळ सत्तेसाठी होता, असा घणाघातही बावनकुळे यांनी केला. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अभद्र युती केली. त्यामुळे त्यांच्याकडील नेते आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत. हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळेच ठाकरे गटातील लोक शिंदेसेनेकडे वळत आहेत,” असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपच्या टीकेला काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. “सत्ता मिळताच अनेकांच्या डोक्यात हवा जाते, त्यांच्या लोकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होतो,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्यावर केला.

काँग्रेसचे येतील अच्छे दिन 

“कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. सत्तेचा माज करणाऱ्या अनेक नेत्यांना इतिहासाने धडा शिकवला आहे. काँग्रेसचे दिवस पुन्हा चांगले येतील,” असा आत्मविश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेसमधील या शब्दयुद्धामुळे आगामी राजकीय समीकरणे अधिक रोचक होण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!