
पारडी उड्डाणपूल नागपूरकरांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी जीवघेणा ठरत आहे. उद्घाटनाच्या घाईत निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने या पुलाला अपघातांचा सापळा बनवले, आणि प्रशासन मात्र निष्क्रिय आहे.
नागपूरच्या पारडी उड्डाणपुलाचे संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. उद्घाटनाच्या घाईगडबडीत या पुलाची गुणवत्ता आणि सुरक्षेची पूर्णपणे वाट लावली गेली आहे. शुक्रवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका कारचे नुकसान झाले आणि दुसऱ्याच दिवशी अनियंत्रित ट्रक पुलावर धडकला. हा ट्रक पुलावरून खाली कोसळला असता, मोठी जिवीतहानी झाली असती. पण यावर प्रशासन शांत आहे, आणि जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही तयार नाही. हा पूल लोकांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी जीवघेणा ठरत आहे. आधीच 9 वर्षांच्या विलंबानंतर उद्घाटन झालेल्या या पुलावर आता अपघातांची मालिका सुरू आहे. पुलाच्या बांधकामात सुरक्षेचा पूर्ण अभाव होता, त्यामुळेच आता वारंवार दुर्घटना घडत आहेत. पुलाच्या उद्घाटनाच्या अवघ्या 24 तासांतच अपघात घडल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बुरखा फाटला आहे.
Maharashtra: नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प दहा मार्चला
कोटींची उड्डाण
2014 मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले, आणि दोन वर्षांनंतर काम सुरू झाले. तीन वर्षांत पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला अखेर 9 वर्षे लागली. हेच नाही, तर 446 कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च 646 कोटींवर गेला. इतकी प्रचंड रक्कम खर्च करूनही नागपूरकरांना सुरक्षित पूल मिळाला नाही आहे. या पुलाच्या बांधकामात वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीमुळे हा पूल अक्षरशः ठिगळं जोडलेला भासतो. कंत्राटदार, सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या संगनमताने जनतेच्या पैशांवर मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. पण आजवर कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. नेहमीप्रमाणे चौकशीचे आश्वासन दिले जाईल आणि नंतर सर्व काही दडपले जाईल.
Vijay Vadettiwar: संतांच्या वादग्रस्त वक्त्यव्यावर नागपुरात रस्त्यावर उतरले अनुयायी
सत्ताधाऱ्यांची फसवणूक
पूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भारतनगर येथे पुलाचा एक स्पॅन कोसळला होता. त्यानंतर पारडी चौकात एक ट्रक पुलावरून खाली लटकला होता. तरीही प्रशासन जागे झाले नाही. आता पुन्हा अपघात होत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याबद्दल जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी इतकी घाई करण्यात आली. लोकांना एक कार्यक्षम आणि सुरक्षित पूल देण्याऐवजी फक्त प्रसिद्धीसाठी पूल उघडण्यात आला. सत्ताधारी नेत्यांनी जनतेला फसवले आहे. खरेतर, या पुलाच्या दर्जाबाबत पूर्ण चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. पण राजकीय साठगाठीत हे प्रकरणही दडपले जाण्याचीच शक्यता आहे.
पुलाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तपासणी व्हायला हवी, अन्यथा भविष्यात आणखी मोठे अपघात घडू शकतात. 646कोटींच्या पुलासाठी जीव धोक्यात घालायचा का? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल.