
जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गुप्त भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांची नांदी की फक्त विकासकामांची चर्चा याबद्दल विरोधकांचा संशय वाढतोय, तज्ज्ञ नवे अंदाज लावतायत, पण खरा हेतू अजूनही गुलदस्त्यात.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गुप्त भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-राष्ट्रवादीमधील संभाव्य समीकरणांवरून चर्चेला उधाण आले आहे. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार अशा चर्चांनी सध्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
आता खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनीच याबाबत खुलासा केला आहे. ही भेट फक्त विकासकामांसाठी होती. कोणत्याही राजकीय चर्चेला स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय तज्ज्ञ आणि विरोधी पक्षांचे नेते या विधानावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. कारण याआधीही जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, आणि त्यानंतरही अशाच चर्चांना उधाण आले होते.

अफवांना उधाण
सोमवारी रात्री 8.30 ते नऊच्या दरम्यान जयंत पाटील माझ्या अधिकृत बंगल्यावर आले होते. मात्र, त्यांच्यासोबत चारशे ते पाचशे लोक उपस्थित होते. त्यामुळे ही गुप्त भेट नव्हती. तसेच, कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बावनकुळे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. अशा स्थितीत त्यांची भाजप नेत्यांशी सतत गुप्त बैठक होणे, हा योगायोग असू शकत नाही, असे राजकीय तज्ज्ञ आणि विरोधी पक्षनेत्यांचे मत आहे.
नाराजीचे सूर
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जयंत पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, त्यांच्या भाजप नेत्यांसोबत वाढत्या भेटींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मागील महिन्यातच पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गुपचूप भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे फडणवीसांनी जयंत पाटलांना भाजपमध्ये आणण्यासाठी सूत्रे हलवली, हा चर्चेचा नवा मुद्दा निर्माण झाला आहे.
Amol Mitkari : मंत्र्यांच्या ओएसडीनेच मागितली लाखो रुपयांची लाच
महामार्गावरून घमासान
शक्तीपीठ महामार्गावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील शेतकरी या महामार्गाला तीव्र विरोध करत असून काँग्रेसने या प्रकरणावर आंदोलन छेडले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणारच. समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला, तसेच शक्तीपीठ महामार्गामुळेही विकास होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यावर टीका करत सरकारला घेरले आहे.
पाटील यांची भूमिका
बावनकुळे यांच्या स्पष्टिकरणानंतरही एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे तो म्हणजे जयंत पाटील यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दलचा. बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी एवढा मोठा नाही की जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलू शकतो.” मात्र, त्यांच्या या विधानावरूनच काहीतरी मोठी राजकीय खेळी सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.