महाराष्ट्र

Mahayuti : देवाभाऊ मंत्र्यांना म्हणाले; चांगलं ‘बिहेव्ह‘ करा

Maharashtra : मुंडेंच्या पाठोपाठ अजून कुणाची बॅटिंग संपणार

Author

धनंजय मुंडे प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची तातडीची बैठक घेऊन कठोर इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. मात्र, ही बैठक म्हणजे नेहमीसारखी सल्लामसलत नव्हती, तर एक कठोर इशारा होता. मंत्रिपदावर राहायचं असेल, तर वर्तन स्वच्छ ठेवा, अन्यथा घरी जा असा कडक संदेश मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे.

धनंजय मुंडे यांची गेल्या काही महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर काल त्यांनी राजीनामा दिला, पण त्यांनी प्रकृतीच्या कारणावर तो टाकला. प्रत्यक्षात, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि त्यामुळे मुंडे यांना पदावर राहणे अवघड झाले. वाल्मिक कराड, जो या प्रकरणाचा मास्टरमाइंड मानला जातो, तो मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा ठपका होता. त्यामुळेच विरोधकांनी राजीनाम्याची मागणी जोर धरली होती. आता प्रश्न असा आहे की फडणवीस यांना अचानक मंत्र्यांना इतका कडक इशारा का द्यावा लागला?

Mahavikas Aghadi: महिला असुरक्षित, मंत्री बेशरम 

सावध रहा नाहीतर

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना महत्त्वपूर्ण खाते मिळाले. मात्र, हत्या प्रकरणामुळे त्यांच्या निकटवर्तीयांचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यांच्या राजकीय भवितव्यावर टांगती तलवार आली. याच पार्श्वभूमीवर, भाजपच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडे बोल सुनावले.

बैठकीत काही मंत्र्यांनी दबक्या आवाजात सरकारच्या वाढत्या बदनामीबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, फडणवीस यांनी कोणाचाही आवाज ऐकला नाही. ‘जनतेत सरकारची प्रतिमा मलीन होईल, असे वागत असाल तर तुमच्यासाठी मंत्रिपद नाही,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यामुळे काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. काहींना असे वाटते की, फडणवीस यांचा इशारा केवळ शिस्तबद्धता राखण्यासाठी नाही, तर काही मंत्र्यांना अडचणीत टाकण्यासाठी आहे.

मुख्यमंत्र्यांचा अतिरेकी इशारा

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना काही ‘अतिरिक्त’ सूचना दिल्या. भाजपच्या आमदारांशी आदराने वागा, त्यांचे कामे मार्गी लावा, आणि जनतेला नाराज करू नका, असा स्पष्ट इशारा दिला. विशेष म्हणजे, मोबाईलवर कोणाशी बोलताना जपून बोला, कोणत्याही चुकीच्या गोष्टीत अडकले, तर मंत्रीपदावर परिणाम होईल, असेही त्यांनी ठासून सांगितले.

अनेक नेत्यांना या संपूर्ण विधानाने धक्का बसला आहे. काहींनी खासगीत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एका प्रकारे धमकीच दिली आहे. भाजपमध्ये सर्वसामान्य आमदारांना जास्त महत्त्व देण्याची नवीन संस्कृती रुजवण्याचा हा प्रयत्न आहे, पण आमच्या स्वायत्ततेवर गदा येईल.’

भाजपमध्ये नाराजी

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर भाजपच्या काही मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही जणांना असे वाटते की, सरकारचा रोख ठराविक मंत्र्यांवर आहे, आणि काही जणांना मुद्दामहून टार्गेट केले जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात आणि काही मंत्र्यांना पद सोडावे लागू शकते.

मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेमुळे सरकारमध्ये एक प्रकारची दडपणाची स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी यावर लगेच प्रतिक्रिया देत भाजपमध्ये फूट पडल्याचा आरोप केला आहे. एक वरिष्ठ विरोधी नेते म्हणाले, फडणवीस यांनी हे केलेले वक्तव्य म्हणजे सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा रोख इतर मंत्र्यांवर आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!