
बीडमध्ये भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याने निर्घृणपणे प्राण्यांची हत्या केली आणि लोकांना अमानुष मारहाण केली.
बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत. एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. मात्र दुसरीकडे आता एक नवं कांड समोर आलंय, ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते. पण आता हेच बीड पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या काळ्या सावटाखाली का आलंय? कारण आता बातच नाही मानवांची, तर निरीह प्राण्यांचीही कत्तल सुरू झालीय. हे सगळं घडतंय महायुती सरकारच्या नाकाखाली. काय चाललंय रे बाबा या सरकारचं?, आता असाच प्रश्न निर्माण झालंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप बीडचे आमदार सुरेश धस यांनी तर जणू कंबर कसली होती. त्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि खुन्यांना शिक्षा व्हावी म्हणून जीवाचं रान केलं. या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. आरोपपत्रात तर थेट कराड हाच या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं गेलंय. धस यांनी मुंडेंवरही सणसणीत टीकेचे फटके मारले, ‘अरे, तुमच्या माणसांनीच हे रक्तपात केलंय, आता काय लपवणार?’ असं म्हणत त्यांनी मुंडेंना चांगलंच घेरलं. बीडच्या जनतेला वाटलं, ‘हा धस आता खरंच गुंडगिरी संपवणार!’ पण आता एक व्हायरल व्हिडीओनं सगळं चित्रच पालटलंय. तेही असं, की कोणीही थक्क होईल.

दुसरा वाल्मिक कराड
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण बॅटने एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसला. हा तरुण दुसरा-तिसरा कोणी नसून भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ होता. हा खोक्या सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलंय. जे धस बीडची गुंडगिरी संपवायला निघाले होते, त्यांच्याच माणसानं आता हा राडा घातलाय. खोक्याकडे तर भाजपच्या महाराष्ट्र भटक्या शिरूर तालुक्यातील धागडे बाप-लेकाला त्यानं इतकं मारलं की दिलीप धागड्यांचे दात पडले, जबडा फुटला, आणि महेश धागड्यांचा पायच निकामी झाला. ‘काय रे भाऊ, हीच का तुझी न्यायाची लढाई?’ असं म्हणत लोक आता धसांवरच बोट दाखवतायत.
परंतु खोक्याचा खेळ इथेच थांबत नाही. या राक्षसानं फक्त माणसांनाच नाही, तर हरिणं, काळवीट, मोर यांसारख्या संरक्षित प्राण्यांचीही कत्तल केलीय. आष्टी, शिरूर, आणि पाटोदा परिसरात 200 हून अधिक हरिणांची शिकार, मोरांचे पंख उडवणं, आणि हजारो प्राण्यांचा जीव घेणं, हे सगळं खोक्या भोसलेचं कारनामं आहे. धागडेंनी शेतात हरिणं पकडण्यास विरोध केला, तर खोक्यानं त्यांना इतकं मारलं की रक्ताचं पाणी झालं. हे सगळं घडतंय महायुती सरकारच्या डोळ्यांदेखत. महायुतीला लागली कोणाची नजर, की हे सगळं मुद्दामच चाललंय? असा सवाल आता जनता विचारतेय.
खोक्याला कुणाचा आशीर्वाद
खोक्या भोसले फक्त गुंड नाही, तर एक शिकारी राक्षस आहे. जो वन्यजीवांचा खात्मा करतोय. पण वनविभाग काय करतोय? हजारो प्राण्यांची कत्तल झाली, आणि त्यांना काहीच कळलं नाही? की खोक्यावर कोणाची तरी मेहरबानी आहे? व्हिडीओ व्हायरल झालर आणि तेव्हा वनविभागाला जाग आली. त्यांनी हरिणांचे अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. पण हा सगळा खेळ उशिरा का सुरू झाला? वनविभागाला काय झोप लागली होती का? असं म्हणत लोक आता संतापलेत.
महायुती सरकारवर आता प्रश्नांचा भडिमार होतोय “संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड फरार, आता खोक्याची ही टोळी उघड, आणि तरीही तुम्ही गप्प का? बीडच्या जनतेला आता वाटतंय की हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतंय. सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या जर असा खुलेआम रक्तपात करत असेल, तर धसांची गुंडगिरी संपवण्याची भाषा किती खरी? आणि महायुती सरकारचं हे नाकर्तेपण कधी संपणार प्रश्न उपस्थित झालंय.