महाराष्ट्र

Mahakumbh : राज ठाकरेंच्या ‘गंगाजल’ टीकेवर, नितेश राणेंचा ‘संध्याजल’ने हल्ला

MNS vs BJP : मनसे प्रमुखांच्या वक्तव्यावरून तापले वातावरण

Author

राज ठाकरे यांच्या गंगाजलाबद्दलच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

गंगाजल पिणार नाही, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. संध्याकाळी 7.30 नंतरचं पाणी चालतं? त्याने खाज येत नाही का? असा बोचरा सवाल करत राणेंनी राज ठाकरेंना डिवचले आहे.

राज ठाकरेंच्या या विधानावरून हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या असून, त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यात राज ठाकरे नितेश राणेंना काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांनी गंगाजलाबद्दल बोलताना गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी थेट शब्दांत विचारले होते, माणसं, बाया गंगेच्या पात्रात घासतायेत आणि त्याच पाण्याचं गंगाजल म्हणून पूजन केलं जातं. अरे कोण पिणार हे पाणी? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले की, श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी देशामधली स्वच्छ नाही आणि आम्ही तिला गंगाजल म्हणून स्विकारतोय. बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आला, पण मी म्हणालो हाड! मी नाही पिणार! श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घ्या.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

राज ठाकरेंच्या या विधानावर भाजप नेते नितेश राणे संतापले आणि त्यांनी कडाडून प्रतिआक्रमण केलं. संध्याकाळी 7.30 वाजेनंतरचं पाणी घेताना खाज येत नाही का? आमच्या गंगाजलावरच प्रॉब्लेम का?” असा घणाघाती सवाल करत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राणे यांनी पुढे सांगितले की, “मी स्वतः गंगास्नान करून आलोय. माझ्या आईबरोबर गेलो होतो. आतापर्यंत काही त्रास झालेला नाही. कोट्यवधी लोक महाकुंभस्नान करतात, गंगाजल पितात. मग अचानक गंगाजलवर आक्षेप का? त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं, “फक्त हिंदू धर्मावर टीका केली जाते. हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही आमचे सण-उत्सव अभिमानाने साजरे करणार. मग बकरी ईदला बकऱ्या कापतात तेव्हा कोणी काही बोलत नाही. मग हिंदूंनाच का लक्ष्य केलं जातं?”

वादाचा पुढचा टप्पा

गंगाजलवरून या वादामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज ठाकरेंनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी आहे. भाजप देखील सावध पवित्रा घेत आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नितेश राणेंच्या टिकेला कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गंगाजल वि. संध्याजल या चर्चेने राजकीय वातावरण तापवले आहे. या वादाचे पुढे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!