
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भाजप युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या मोठी उलथापालथ दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या तप्त उन्हाइतकाच राज्यातील राजकारणही तापले आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जबाबदारी स्वीकारताच पक्षाची ताकद वाढवण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीत मोठी हालचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सपकाळ वेगवेगळ्या शहरांचा दौरा करत आहेत. सध्या ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी सत्ताधारी भाजप युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, सध्याचे सरकार केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे, तर जनतेच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित केल्या जात आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टोळ्यांचे सरकार
रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप युती सरकारवर जोरदार प्रहार केला. त्यांनी सरकारला ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील टोळीप्रमुखांशी तुलना करत हे टोळ्यांचे सरकार असल्याची टीका केली.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, कर्जमाफीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्य सरकारने मोठ्या गाजावाजासह लाडकी बहिण योजना आणली, मात्र प्रत्यक्षात १० लाख महिलांना याचा लाभ मिळालाच नाही. आश्वासने देऊनही ती पूर्ण न करणाऱ्या सरकारची किंमत जनतेला चुकवावी लागत आहे, असे सपकाळ म्हणाले.
Nitin Gadkari : जो करेल जातिवादाची भाषा, त्याला माझी घणाघाती लाथ
शासनाचा बेजबाबदार कारभार
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील ढासळली आहे, असे सांगत सपकाळ यांनी बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या क्रूर हत्येचा संदर्भ दिला. या हत्येच्या मागे कोण होते, हे जनतेने पाहिले आहे. सरकारमधील मंत्र्यांचे एकमेकांशी पटत नाही, त्यांच्या वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम पसरतो आहे. एका मंत्र्याने खोटी कागदपत्रे दिल्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळ सरकारकडून सुरू असल्याचा घणाघाती टीका त्यांनी केली.
कोकणातील खनिज संपत्तीचा गैरफायदा घेण्यासाठी सरकार कट रचत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे आणि हे खनिज केवळ उद्योगपतींच्या ताब्यात द्यायचे आहे. त्यासाठी कोकणातील जनता आडवी येऊ नये म्हणून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. मुंबई आणि कोकण यांचा घनिष्ठ संबंध आहे. तो संबंध तोडण्याचा प्रयत्नही सरकार करत आहे. कोकणातील मराठी बाणा मोडून काढण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात
कोकणात पंज्याची ताकद
महायुती आणि आघाडीच्या राजकारणामुळे काँग्रेसला काही मर्यादा आल्या असल्या तरी आता पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. आघाडी करताना काही मर्यादा येतात, मात्र आता आम्ही कोकणात काँग्रेस संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. सिंधुदुर्गपासून याची सुरुवात झाली आहे. संपूर्ण कोकणात काँग्रेसच्या प्रभावाला बळ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन ठोस आहे, हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. आता जनतेच्या प्रतिसादावरच काँग्रेसच्या या नव्या रणनीतीचे यश अवलंबून राहील.