
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबशी केली, त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उभा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, विरोधी पक्षानेही या वक्तव्याचा निषेध केला आहे. सपकाळ यांच्या विधानामुळे राजकीय नाट्य निर्माण झाले असून, काँग्रेसच्या गोंधळलेल्या रणनीतीचा हा एक भाग असल्याची चर्चा सुरू आहे.
फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ यांनी मर्यादा ओलांडत त्यांना क्रूर म्हणत औरंगजेबचा दाखला दिला. त्यांनी दावा केला की, फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा नाश करत आहेत. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसचाच इतिहास समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारी काँग्रेसच कधी आणि कुठे त्या विचारांसाठी लढली, हा प्रश्न आता मराठी जनतेला पडू लागला आहे.

Ramdas Athawale : मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलल्यावरून आठवलेंचा भाजपला टोला
राजकीय अस्तित्वासाठी खेळी
काँग्रेस सध्या अस्तित्वाच्या संकटात आहे. राज्यात आणि केंद्रात नेतृत्वाच्या कमतरतेमुळे पक्ष ढासळला आहे. अशा परिस्थितीत सपकाळ यांच्यासारखे नेते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भडक विधाने करत आहेत. त्यांच्या विधानाचा खरा उद्देश हा काँग्रेसला मिळत असलेले मर्यादित राजकीय स्थान टिकवणे आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अनेकदा कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीय तणाव आणि प्रशासनातील ढिसाळ कारभार यामुळे जनतेचा विश्वास उडाला. मात्र, आता इतिहासाचे चुकीचे संदर्भ देत, आणि हिंदुत्वनिष्ठ नेतृत्वाला टार्गेट करत, काँग्रेस जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहे, असे भाजपचे यावर उत्तर आहे.
हिंदुत्वावर हल्ल्याचा डाव
हर्षवर्धन सपकाळ यांची वक्तव्ये केवळ एका विशिष्ट राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचे स्पष्ट दिसते. काँग्रेसने कायम हिंदुत्ववादी नेत्यांवर आरोप करून समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्थैर्य आणि विकासाचे धोरण राबवले आहे, जे काँग्रेसला पचत नसल्याचे भाजप नेत्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच सपकाळ यांसारखे नेते ऐतिहासिक उदाहरणे विकृत करून हिंदू विचारधारेवर हल्ले करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सपकाळ यांनी स्वतःच्या पक्षाच्या चुका कधीही मान्य केल्या नाहीत. त्यांच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्रात कित्येक वर्षे सत्तेत राहून कोणते शिवरायांचे विचार टिकवले, हा सवाल अनुत्तरित आहे. औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा फडणवीस यांनी उचलला, यावरून सपकाळ यांनी मराठी अस्मितेचा अपमान केल्याचे जनतेला जाणवत आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपसाठी संविधान बाजूला, बंच ऑफ थॉट्स पुढे
राजकारणाला कंटाळा
सपकाळ यांचे हे वक्तव्य राजकीय नौटंकी असून, त्यात कोणतीही तथ्यता नाही. महाराष्ट्रातील जनता आता केवळ काम आणि विकास पाहते. चुकीच्या इतिहासाच्या संदर्भांचा आधार घेऊन, आपल्या पक्षाच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा सपकाळ यांचा हा प्रयत्न आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना अनेकदा धडा शिकवला आहे आणि भविष्यातही शिकवेल.राजकीय तापमान वाढवण्यासाठी सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची वेळ आता संपत आली आहे. महाराष्ट्राला नेतृत्व, विकास आणि स्थैर्य हवे आहे, दिखाऊ आरोप आणि खोट्या कथा नाहीत. सपकाळ यांनी औरंगजेबचा दाखला देऊन जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला असला, तरी महाराष्ट्राचा जागृत मतदार याला प्रतिसाद देईल की काँग्रेसला आणखी एक धक्का बसेल, हे लवकरच स्पष्ट होईल.