
नागपुरातील दंगलीनंतर महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर कडक नजर ठेवत अफवांचा प्रसार रोखण्यासाठी उच्चस्तरीय कारवाई सुरू केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजविघातक प्रचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात उसळलेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सायबर सेलला उच्चस्तरीय सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः नागपूरच्या महाल भागात झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सावध झाले आहे. महाल याच परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील आहे. सोशल मीडियावर भ्रामक माहिती पसरवून परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र सायबर सेलने कठोर पावले उचलली आहेत.
सायबर सेलच्या आयटी तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट शोधून काढण्याचे अभियान हाती घेतले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवरील विविध गटांमध्ये सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीद्वारे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींना तातडीने शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी काही शब्दांचा वापर करून सर्च केला जात आहे.

Nagpur : उपराजधानीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची तातडीने बैठक
अफवांवर कारवाई
अमरावतीमध्ये यापूर्वी झालेल्या दंगलीदरम्यान, काही मिनिटांतच दहा हजारांहून अधिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याचा थेट परिणाम जमावाच्या भावनांवर होऊन हिंसाचाराला खतपाणी मिळाले होते. नागपूरच्या घटनेनंतर असाच प्रकार अन्य ठिकाणी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर सेलने तयार केलेल्या विशेष पथकांमार्फत राज्यभरातील डिजिटल गस्त वाढवण्यात आली आहे.
कोणत्याही सामाजिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या पोस्ट्स, व्हिडीओ किंवा संदेशांना तत्काळ डिलीट करण्यास भाग पाडले जात आहे. यासोबतच, अशा पोस्ट शेअर करणाऱ्यांचे अकाउंट बंद करण्यासोबतच, त्यांच्यावर फौजदारी कलमांनुसार गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचा अत्याधुनिक प्रयोग
सायबर सेलने यंदा AI आणि डेटा अॅनालिटिक्सच्या माध्यमातून अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्याची यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. कोणतीही पोस्ट किंवा मेसेज काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचत असल्याने, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर सेल उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशेष म्हणजे, आता कोणत्याही पोस्टचे सत्यापन करण्यात येत आहे. खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या युजर्सवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे अफवा पसरवणाऱ्यांना यंदा तुरुंगाची हवा खावी लागेल, असे चित्र दिसत आहे.