महाराष्ट्र

Eknath Shinde : औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे थेट देशद्रोह

Nagpur Riots : एकनाथ शिंदे यांनी डागली तोफ 

Author

महाराष्ट्राच्या अस्मितेवर औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने हा वाद आणखी चिघळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडव्या शब्दांत याला विरोध करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेवर पुन्हा एकदा मोठे राजकीय वादळ घोंघावत आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने हा वाद अधिक तीव्र झाला आहे. सपकाळ यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसला खडसावले असून, महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या प्रवृत्तींचा सरकार कडवा विरोध करेल, असा ठाम संदेश दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे आणि यामागचे सूत्रधार कोण आहेत, याचा सरकार शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर कुणी असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना कठोर शासन भोगावे लागेल.

Nagpur Riot : मुख्यमंत्र्यांनी कोणाचे डोळे काढले? काँग्रेसवर शिंदे संतप्त

अपमान खपवणार नाही

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे हिंदवी स्वराज्यासाठी दिले गेले. औरंगजेबाने चाळीस दिवस त्यांच्या देहावर अनन्वित छळ केला. त्यांच्या जिभेवर क्रूरता करून ती छाटली, अंगावरील सालटी काढली, त्यावर गरम तेल आणि मीठ ओतले. असा अमानुष छळ करणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान करणेच आहे. हा खऱ्या अर्थाने देशद्रोह असल्याचे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आंदोलनाची लाट 

शिंदे यांनी ठणकावले की, महाराष्ट्रात औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाला महान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, तो महाराजांच्या भूमीत कदापि सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ऐतिहासिक वाद नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा थेट हल्ला आहे. जो कोणी या प्रवृत्तीला पाठिंबा देईल, त्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. राज्यभरात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीविरोधात संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनाची लाट उसळली आहे. शिवभक्त, मराठा संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सरकारला मागणी केली आहे की, महाराष्ट्रात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाला थारा मिळता कामा नये.

औरंग्या महाराष्ट्राला कलंक 

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, औरंगजेब कोणाचा सगा सोयरा नाही, तो कोणाचा नातेवाईक नाही. उलट औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. आमच्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभारले, मराठ्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. त्या क्रूर आक्रमकाला मोठे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. राज्यात सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कठोर भूमिका घेत असल्यामुळे आता सरकार कोणते पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!