महाराष्ट्र

Nagpur Riot : औरंगजेबाचा मुद्द्यावर संघाने टोचले कान

Aurangzeb Issue : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विषय काळानुरूप नाही

Share:

Author

नागपुरातील महाल भागात घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर गरळ ओकणाऱ्या नेत्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कान टोचले आहे. बेंगरुळू येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर सुनिल आंबेकर यांनी याबाबत भूमिका जाही केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या महाल भागात घडलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरळ ओकणाऱ्यांचे कान टोचले आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या अजिबात कालाधारित नाही. हा मुद्दा उकरून काढण्यासाठी अशी कोणतीही परिस्थिती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा कोणत्याही कधीही हिंसेचे समर्थन करीत नाही. औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या हिंसाचाराचेही संघ कधीही समर्थन करणार नाही, असे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी जाहीर केले.

बेंगळुरू येथे संघाची बैठक पार पडली. त्यानंतर आंबेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी याबाबत विचारल्यानंतर आंबेकर म्हणाले की, औरंगजेबाचा मुद्दा सध्या प्रासंगिक नाही. नागपूर पोलिसांनी व्यापक कारवाई केली आहे. अद्यापही पोलिस आरोपींची धरपकड करीत आहेत. त्यामुळे कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणत्याही कृत्याचे समर्थन करता येणार नाही, असे आंबेकर म्हणाले. नागपूर येथे महाल भागात विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर महालात दंगल घडली.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

भरडले गेले पोलिस

विश्व हिंदू परिषद नागपुरातील कोणत्याही कोपऱ्यात आंदोलन करू शकत होती. नागपुरातील संविधान चौक, सीताबर्डी चौक अशा भागांमध्ये सहसा आंदोलनं केली जातात. मात्र विश्व हिंदू परिषदेने महाल भागाचीच निवड का केली, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. महालचा भाग भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड आहे. संघाचे मुख्यालय देखील याच भागात आहे. त्यामुळं या भागात दंगल घडणे म्हणजे धक्कादायक बाब मानली जात आहे.

दंगलीमध्ये सगळ्यात जास्त नागपूर पोलिस भरडले गेले. पोलिस उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी गंभीर जखमी झालेत. उपायुक्त निकेतन कदम यांचा जीव तर थोडक्यात वाचला. एका महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं या दंगलीबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाचा मुद्दा प्रासंगिक नसल्याची भूमिका घेतल्याने आता तरी प्रक्षोभक भाषणबाजी करणाऱ्यांनी धडा घ्यावा, असाच संदेश संघाने सगळ्यांना दिला आहे. आतातरी भाजपने यातून धडा घ्यावा, अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.

विहिंप सावध

संघाच्या या भूमिकेनंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे म्हणाले की, एक दिवसाचे आंदोलन होते. हे संपले आहे. पुढे काय करायचे याबाबतची वाटचाल ठरविण्यात येईल. संघाकडून व्यक्त करण्यात आलेली भूमिका आणि वक्तव्य अद्याप पाहिलेले नाही. त्यामुळे यावर बोलता येणार नाही. लवकरच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही शेंडे म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!