
अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवनवीन रंग दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांपासून सुरू झालेला प्रशांत कोरटकर प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. हा वाद आधी औरंगजेबावर केंद्रित झाला, त्यानंतर पुन्हा कोरटकरवर लक्ष केंद्रीत झाले. अखेर, एका महिन्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, या अटकेवरून आता काँग्रेसकडून मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
नागपुरात मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांचे नाव यात ओढले गेले. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दावा केला की, अटकेवेळी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी प्रतिक पडवेकर कोरटकरसोबत होता. हा आरोप भाजपला अजिबात पटलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी लोंढे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके आणि इतर नेत्यांनी 28 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फडणवीसांची प्रतिमा मालिन
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपामुळे तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. यामुळे कोरटकरच्या अटकेची मागणी अधिक जोर धरू लागली. अखेर 25 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून कोरटकरला अटक केली.
भाजपने लोंढे यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी जाणून-बुजून खोटे आरोप करण्यात आले आहेत. भाजपने आरोप केला आहे की, काँग्रेस हे सगळे केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहे.
भाजप आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. कोट्यवधी शिवप्रेमी जनतेमध्ये या प्रकरणामुळे तीव्र संताप आणि आक्रोश निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. समाजातील विशिष्ट वर्गांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
खोट्या विधानांमुळे अफवा पसरवून फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे. या आरोपांमुळे राज्य सरकारविषयी लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊन मुख्यमंत्र्यांविषयी चुकीचा समज पसरवला जात असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे लोंढे यांच्याविरोधात कारवाही करत फेक न्यूज प्रतिबंधक कायदा 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.