
नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात त्यांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायावर आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दावा केला आहे की, मोदींनी दिलेल्या दोन संदेशांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची लिखाणशैली दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याने राजकीय वातावरण तापवले आहे. दौऱ्याची सुरुवात त्यांनी रेशीमबाग येथे डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून केली. त्यानंतर दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आदरांजली अर्पण केली. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते माधव नेत्रालयाच्या शिलान्यासासाठी पोहोचले. मोदी यांच्या आगमनापूर्वीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. संघाच्या गडावर मोदींच्या उपस्थितीवर टीका करण्याची संधी काँग्रेसने सोडली नाही. मोदींनी दोन महत्त्वाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या अभिप्रायावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
लोंढे यांनी सोशल मीडियावर एक्सवर पोस्ट शेअर करत, मोदींनी लिहिलेल्या दोन अभिप्रायांची तुलना केली. त्यांच्या मते, दोन्ही संदेश वेगवेगळ्या हस्ताक्षरात असल्याने त्यावर शंका उपस्थित केली जाते. त्यांनी ‘एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या लिखाणशैलीत कसा लिहू शकतो?’ असा सवाल उपस्थित केला. विशेषतः, हेडगेवार आणि गुरुजींना अभिवादन करताना मोदींनी व्यक्त केलेल्या भावना आणि त्या लेखनातील फरक लोंढेंनी दाखवून दिला. 2024 वर्षाचे नरेंद्र मोदींचेच एक अभिप्राय आणि नागपूर दौऱ्याचे अभिप्राय या दोघांची तुलना केली आहे. त्यांनी दोन्ही लिखाण वेगळे असल्याचे म्हटले आहे.

PM At Nagpur : एका रोपट्याचा वटवृक्ष होईपर्यंतचा अविरत प्रवास
लोंढेची यापूर्वीही टीका
कोंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणात फडणवीस सरकारवर टीका केली होती. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दावा केला की अटक होताना मुख्यमंत्री कार्यालयातील प्रतिक पडवेकर हे कोरटकरसोबत उपस्थित होते. भाजपने हा आरोप फेटाळून लावला आणि लोंढेंवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके आणि अन्य नेत्यांनी 28 मार्च रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
राज्यभर गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडावर गुढी उभारली. नागपूर दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, या दौऱ्यामुळे नागपूरकरांना वाहतुकीच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. रविवार असल्याने आणि गुढीपाडव्याचा सण असल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. मात्र, मोदींच्या दौऱ्यामुळे शहरातील अनेक भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका