महाराष्ट्र

Bacchu Kadu : रवी राणांचा कडूंना चिमटा; म्हणाले मंत्रिपद असताना झोपा काढल्या

Ravi Rana : शेतकरी आंदोलनाचा राजकीय रणांगण 

Author

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर जोरदार टोला लगावला आहे. आता जाग आली? असा सवाल करत त्यांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाच्या काळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी रात्री नाशिकमध्ये जोरदार आंदोलन छेडले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी टेंभा आंदोलन केलं आणि सरकारला थेट इशारा दिला. 17 एप्रिलपर्यंत कर्जमाफीबाबत ठोस निर्णय न झाल्यास दर पंधरा दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडली जाईल. तर अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं.

बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांसाठी संघर्ष केवळ नाशिकपुरताच मर्यादित राहिला नाही. अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन छेडलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी केलं. आंदोलनकर्त्यांनी रवी राणा यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. विशेष म्हणजे, स्वतः रवी राणा यांनी निवेदन स्वीकारून आंदोलकांशी संवाद साधला.

जोरदार टोला

बोलताना रवी राणांनी बच्चू कडूंवर सूचक टीका केली. त्यांनी म्हटलं, शेतकऱ्यांसाठी आणि अपंगांसाठी आम्ही संपूर्ण ताकदीने सरकारवर दबाव आणतो. पण बच्चू कडूंना आता जरा उशीराच जाग आली आहे. जेव्हा ते स्वतः मंत्री होते, तेव्हा त्यांनीच या प्रश्नांची सोडवणूक करायला हवी होती. ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे होते. तेव्हा निर्णय घ्यायला वेळ होता. रवी राणांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा आणि खदखद वाढली आहे. बच्चू कडू यांचा संघर्ष आणि रवी राणांचा टोला यामुळे शेतकरी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

नाशिक येथील आंदोलनात शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, हमीभाव आणि सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी घोषणाबाजी झाली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात टेंभे, भगवे झेंडे आणि गळ्यात निळे दुपट्टे घालून जोरदार मोर्चा काढला. मात्र, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांशी थेट भेट झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडूंनी सरकारविरोधात हल्लाबोल केला. कोकाटे यांचे निवासस्थानासमोरील आंदोलनात बच्चू कडू म्हणाले होते की, कोकाटे कृषीमंत्री आहेत, म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. त्यांनी निदान समोर तरी यायला हवं होतं. आता आम्हाला फक्त आश्वासनं नकोत, निर्णय हवा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही.

ठोस निर्णय अपेक्षित

नाशिकहून सिन्नरकडे जात असताना पोलिसांनी बच्चू कडूंना अडवलं. मात्र त्यांनी स्पष्ट केलं, कर्जमाफी ही आमची मागणी नाही, ती शेतकऱ्यांची हक्काची गरज आहे. 17 तारखेपर्यंत सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. दर पंधरा दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा काढून आंदोलन करणार. हा इशारा नाही, ही घोषणा आहे.

बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, रवी राणांचा उघड टोला, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वाढणारा रोष. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा पेटू शकतं. सरकारला आता फक्त आश्वासनांवर भागवता येणार नाही. निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर 17 एप्रिल महत्त्वाची तारीख ठरणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या गाड्यांची हवा आणि सत्तेचा दबाव दोन्ही उडवण्याचा निर्धार ठामपणे समोर आला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!