महाराष्ट्र

Operation Sindoor : भारत-पाक युद्ध शीगेला, महाराष्ट्रात ऑपरेशन सेफ सुरू

Devendra Fadnavis : राज्याला मिळणार फोर्सफुल फुलप्रुफ सुरक्षा

Author

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा वाढवली. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या सुरक्षिततेसाठी सुरू.

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीने एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे. या बैठकीत सध्याच्या संवेदनशील स्थितीचा सखोल आढावा घेतला जाणार. संपूर्ण राज्यात अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः मुंबई आणि त्याच्या उपनगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण बनले आहेत. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. हा हल्ला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी कारवाईच्या प्रत्युत्तरात करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि अन्य लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय लष्कराने वेळेवर हाणून पाडला.

Nagpur : लष्कराविरोधात पोस्ट; पत्रकाराला अटक

बंदोबस्त तैनात

तणावाच्या या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह विविध राज्यांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे, विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. महत्त्वाची पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, विमानतळे आणि औद्योगिक क्षेत्रांभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्याच्या सर्व पोलीस आयुक्त, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गृहमंत्रालयाचे प्रतिनिधी आणि आपत्कालीन सेवा प्रमुख सहभागी होणार आहेत. या बैठकीत राज्यभरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील काही दिवसांसाठी अंमलात आणाव्या लागणाऱ्या नव्या सुरक्षाव्यवस्थेवर चर्चा होणार आहे.

Praful Patel : आधी देशासाठी एकत्रीकरण, नंतर पाहू राजकारण 

सजग राहण्याचे आवाहन 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्व पोलिस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शहरांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा तत्काळ स्थगित केल्या आहेत. वैयक्तिक आणीबाणीशिवाय कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातच राहण्याचे आणि संपूर्ण वेळ सतर्कतेने ड्युटीवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तपास अधिक अचूक

तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच ठाणे येथे पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण सुरक्षा सुधारणा जाहीर केल्या आहेत. राज्यातील पोलिस युनिट्सना अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन्स आणि टॅब्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारी तपास अधिक अचूक आणि वेगवान होणार आहे. सीसीटीएनएस-2.2 आणि आयसीजीएस-2.2 प्रणालींच्या माध्यमातून माहितीचे केंद्रीकरण, विश्लेषण आणि गतीशील निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महासायबर केंद्राकडून सायबर क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, सायबर युनिट सतत ऑनलाईन गस्त घालत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘सेफ स्ट्रीट’ मोहिम राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस गस्त, सीसीटीव्ही वाढवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलीस उपस्थिती वाढवली जाणार आहे.

राज्य सरकारने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. सार्वजनिक ठिकाणी अधिक काळ सतर्कता ठेवावी आणि गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

देशभरात निर्माण झालेल्या या अति-संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारने वेळीच पुढाकार घेत गंभीरतेने सुरक्षेची जबाबदारी हाताळण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सुरक्षात्मक यंत्रणा केवळ तात्कालिक नव्हे, तर दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी सरकार सज्ज असून, नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!