
अकोला अचानक झालेल्या मुसळधार पावसाने थैमान उडवला. रस्त्यांवर नदी नाल्यासारखे पाणी वाहू लागले. शहरातील नागरिक त्रस्त झाल्याने अकोला पश्चिमचे आमदार यांनी प्रशासनाला खडसावत निर्देश दिले.
अकोल्यात 27 मे मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहर थरारून गेलं. तासाभरात रस्ते नदीनाल्यांप्रमाणे वाहू लागले. झाडं कोसळली, घरांमध्ये पाणी शिरलं आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. हा पाऊस फक्त निसर्गाचा नाही, तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा देखील परिणाम असल्याचं चित्र या संकटानंतर समोर आलं आहे.
पावसानंतर शहरातील विविध भागांतील परिस्थिती पाहता, प्रशासन तातडीनं हललं. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी 28 मे बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट आणि ठाम शब्दांत सूचना देत जबाबदारीची जाणीव करून दिली.

थोडक्यात प्राण वाचले
पावसाच्या तडाख्याने मोहता मिल परिसरात एक मोठं झाड कोसळून ते थेट एका चारचाकी वाहनावर आघात झालं. त्या वाहनात बसलेल्या महिला व बालकाचा थोडक्यात जीव वाचला हे सुदैव. मात्र, या घटनेने प्रशासनाच्या देखरेखीची खोली उघडी पडली. शहरातील गंगा नगर, नायगाव, भारत नगर, कौलखेड, शिवसेना वसाहत, अकोट फाईल, डाबकी रोड, रायली जीन, अयोध्या नगर यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले.
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आमदार पठाण यांनी प्रशासनाला फटकारलं. आपल्याकडे यंत्रणा असूनही नागरिकांचे हाल होतात, हे दुःखद आहे,असं म्हणत त्यांनी आपत्कालीन कक्षाचा क्रमांक नागरिकांसाठी तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. झोननिहाय व प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करून जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला.
आक्रमक भूमिका
आमदार पठाण यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावलं, मी जनतेचा सेवक आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा. अन्यथा जनतेचा रोष झेलावा लागेल. अधिकाऱ्यांनी स्वतः क्षेत्रात जाऊन पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अन्यथा कारवाई अटळ असल्याचं त्यांनी सांगितलं. महावितरणच्या व्यवस्थापनावरही पठाण यांनी नाराजी व्यक्त केली. मेंटेनन्सच्या नावाखाली निधी खर्च केला जातो, पण सेवा देताना ढिसाळपणा दिसतो. कार्यात गती न आल्यास आगामी अधिवेशनात प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जाईल, असा इशारा पठाण यांनी दिला.
पावसामुळे उडालेल्या टिनपत्र्यांचे, पडलेल्या झाडांचे आणि घरांमधील पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय मदत लवकर मिळू शकेल. कोणीही दुर्लक्ष करू नये, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पठाण यांनी ठणकावून सांगितले. शहरातील पाणी साचलेल्या भागांची यादी देखील बैठकीत मांडण्यात आली. गंगा नगर, खडकी, खैर मोहम्मद प्लॉट, रामदास पेठ, सोनटक्के प्लॉट, आणि खदान परिसर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या भागांमध्ये तातडीने निचऱ्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
सज्ज राहण्याचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, आणि पाणीपुरवठा विभागाने एकत्रितपणे काम करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहण्याची गरज आहे. अकोल्यात पुन्हा एकदा निसर्गाच्या रूपात संकट आलं आहे, पण यंदा नागरिकांना केवळ निसर्गाचा नव्हे, तर हलगर्जी प्रशासनाचा राग देखील झेलावा लागतोय. प्रशासनाने जर या इशाऱ्यांनंतरही वेळेत कार्यवाही केली नाही, तर अकोलावासियांचा संयम संपायला वेळ लागणार नाही.