महाराष्ट्र

BJP : मतपेट्यांच्या मैदानात उर्वरित कमांडर्सची नेमणूक 

Local Body Elections : जिल्हाध्यक्षांच्या रूपात पक्ष संघटनेला नवे हात, नवे श्वास

Author

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने अखेर उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करत रणशिंग फुंकले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पक्षाने अखेर उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे घोषित केली आहेत. या यादीची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होती. यापूर्वी पक्षाने 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध केली होती. परंतु काही जिल्ह्यांतील स्थानिक राजकीय समिकरणे, अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक घोळ यामुळे उर्वरित यादी थांबवण्यात आली होती. अखेर वरिष्ठ नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतर ही प्रतीक्षित यादी जाहीर करण्यात आली.

विशेष म्हणजे, या नव्या यादीत विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या जिल्ह्यांचे राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक स्थान लक्षात घेता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या भागांतील विजय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच या भागात कार्यक्षम, स्थानिक जनतेशी जोड असलेले आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते नियुक्त करून भाजपने आपली रणनीती आखलेली दिसते.

विदर्भातील नेतृत्व

वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व संजय गाते यांच्या हाती देण्यात आले आहे. गाते हे वर्धा जिल्ह्यात सामाजिक कामांमुळे परिचित असून त्यांचा स्थानिक जनतेमध्ये चांगला विश्वास आहे. वर्ध्याचा राजकीय इतिहास पाहता येथे भाजपसाठी संघटनात्मक ताकद निर्माण करणे ही एक मोठी गरज होती. जी आता या नव्या नेतृत्वामुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूरसारख्या कोळसा पट्ट्याने व्यापलेल्या जिल्ह्याचे नेतृत्व भाजपने दोन स्तरांवर विभागले आहे. शहरासाठी सुभाष कासमगुट्टवार यांची निवड करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागासाठी हरिष शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रपूर हे नेहमीच भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचे ठिकाण राहिले आहे. अशा परिस्थितीत, शहर आणि ग्रामीण दोन्ही पातळ्यांवर स्वतंत्र नेतृत्व देऊन पक्षाने दोन्ही भागांत आपले पाय आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात रमेश बारसागडे यांची नियुक्ती ही एक महत्वाची चाल ठरते. रमेश बारसागडे हे गडचिरोलीतील स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते असून त्यांचा जनतेशी थेट संवाद आहे. गडचिरोलीत भाजपला बळकट करण्यासाठी अशा जमीनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती आणि ही गरज या निवडीमुळे पूर्ण होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दारी बैठक

ही यादी तयार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक नेत्यांचे अहवाल आणि कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन ही यादी अंतिम करण्यात आली आहे.

या नव्या 22 जिल्हाध्यक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. यात पालघरमध्ये भरत राजपूत, वसई-विरारमध्ये प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरात अनिल मोहिते, नाशिक शहरात सुनील केदार, नाशिक दक्षिणेत सुनील बच्छाव, नाशिक उत्तरमध्ये यतीन कदम, पुणे दक्षिण (बारामती)मध्ये शेखर वढणे, कोल्हापूर शहरात विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परभणी ग्रामीणमध्ये सुरेश भुबंरे, छत्रपती सांभाजीनगर शहरात किशोर शितोळे, लातूर शहरात अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीणमध्ये बसवराज पाटील, नांदेड उत्तरमध्ये अ‍ॅड. किशोर देशमुख, नांदेड दक्षिणमध्ये संतुकराव हंबर्डे, बीडमध्ये शंकर देशमुख, उत्तर पश्चिम मुंबईत ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईत निरज उभारे आणि दक्षिण मुंबईत शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.

पुढील वाटचाल

या संपूर्ण यादीचा आढावा घेतल्यास स्पष्ट होते की, भाजपने शहरांसोबतच ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः विदर्भातील मागास जिल्ह्यांमध्ये कार्यक्षम नेतृत्व उभे करून भाजपने केवळ निवडणूक तयारीच नाही, तर दीर्घकालीन राजकीय बांधणीचा आराखडा सुद्धा स्पष्ट केला आहे. स्थानिक पातळीवर विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ही यादी निर्णायक ठरू शकते.

या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. जिल्हाध्यक्षांची ही यादी केवळ नावांची यादी नसून, ती भाजपच्या आगामी राजकीय डावपेचाची स्पष्ट नोंद आहे. आता या नव्या चेहऱ्यांपुढे संघटना मजबूत करण्याचे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे मोठे आव्हान असेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!