
भारत-पाक सीमा पार करून कारगिलमार्गे पाकिस्तानमध्ये गेलेली सुनीता जामगडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्यावर विशेष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल होताच कारगिल पोलिसांनी ताबा घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली, मात्र तिथेच त्यांना पहिला झटका बसला.
एकेकाळी अचानकपणे भारत-पाक सीमेवरून कारगिलमार्गे पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेच्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या धक्कादायक घटनेचा तपास आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुनीता यांच्यावर विशेष अधिनियमांतर्गत कारगिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर तिला चौकशीसाठी कारगिलला घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू असतानाच न्यायालयीन प्रक्रिया आणि कागदोपत्री अपूर्णतेमुळे पोलिसांना तात्पुरता झटका बसला आहे.
सुनीता सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कारगिल पोलिसांनी तिला ताब्यात घेण्यासाठी नागपूर न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आवश्यक न्यायिक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे न्यायालयाने सध्या वॉरंट देण्यास नकार दिला. त्यामुळे सुनीता जामगडेचा ताबा न मिळवता कारगिल पोलिसांना माघारी परतावे लागले.

पुढचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, कारगिल पोलिस येत्या आठवड्यात पुन्हा एकदा न्यायालयात नव्याने अर्ज करून प्रोडक्शन वॉरंट मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वेळी आवश्यक सर्व दस्तऐवज आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा अर्ज सादर केला जाणार आहे. या प्रकरणात नागपूर पोलिस आणि कारगिल पोलिस यांच्यात सातत्याने समन्वय सुरू आहे. नागपूर पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कारगिल पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तपास प्रक्रियेचा अडथळा होऊ नये यासाठी दोन्ही विभाग आपापल्या पातळीवर दक्ष आहेत.
घटनास्थळी रिक्रिएशन अनिवार्य
पोलिसांचे म्हणणे आहे की, संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यासाठी सुनीता जामगडेला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचे रिक्रिएशन करणे आवश्यक आहे. यासाठीच तिला कारगिलला नेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जात आहे. सुनीता जामगडेच्या पाकिस्तानमध्ये जाण्याच्या रहस्यमय प्रवासामुळे हे प्रकरण आधीच गाजत होते. आता तिच्यावर विशेष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
पुढील आठवड्यात कारगिल पोलिसांना न्यायालयाकडून वॉरंट मिळते का, आणि त्यानंतर सुनीता कारगिलच्या दिशेने रवाना होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे प्रकरण केवळ एक गुन्हा नसून, देशाच्या सुरक्षेशी निगडित गहन तपासाचे प्रकरण बनत चालले आहे.