
राहुल गांधींच्या मतदार वाढीवरील वक्तव्यावर बावनकुळे यांनी आकड्यांचा हुबेहूब आरसा दाखवत प्रत्युत्तर दिलं. 2009 मधील घडामोडींची आठवण करून देत त्यांनी सगळा चित्रपट उलटवला.
मतदार यादीतील वाढ म्हणजेच संशयास्पद कारस्थान? की केवळ अपयश झाकण्यासाठीचा एक जुना क्लृप्तिविलास? काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदार संख्येतील वाढीवर बोट ठेवत भाजपवर टीकेची झोड उठवली. मात्र, त्यांच्या या आरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या पद्धतीने ऐतिहासिक आकडे मांडत चोख उत्तर दिलं, त्याने राहुल गांधींची भूमिका अधिकच अडचणीत टाकली आहे.
राहुल गांधी यांनी मतदार संख्येत संशयास्पद वाढ झाल्याचा आरोप केलाय. पण त्याचं स्मरणशक्तीचं ‘सिलेक्टिव्ह वाचन’ देशासाठी धोकादायक ठरू शकतं, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे यांनी आकड्यांच्या स्पष्ट पुराव्यांसह राहुल गांधींच्या आरोपांचा भक्कम समाचार घेतला. ते म्हणाले, राहुलजी, तुम्ही म्हणता की पाच महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ झाली. म्हणून ती संशयास्पद आहे. मग 2009 मध्ये काय झालं होतं, ते आठवतंय का?

संख्येचा घोटाळा
बावनकुळे यांचा दावा आहे की, एप्रिल 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात सात कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते. पण त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या सात कोटी 59 लाख 68 हजारांवर पोहोचली, म्हणजे पाच महिन्यांत तब्बल 30 लाखांची वाढ. तेव्हा घोटाळा झाला होता का? का तेव्हा निवडणूक आयोगावर विश्वास होता कारण काँग्रेस सत्तेत होती? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुम्ही जिंकलात तेव्हा सगळं बरोबर, पण जनतेनं झिडकारल्यावरच शंका येतात? हाच तुमचा दुहेरी चेहरा लोकांना ठाऊक आहे. राज्यात पराभव झाल्यावर आता बिहारातही पराभवाची भीती वाटतेय, म्हणून आधीच शंका-कुशंका पेरण्याचा प्रयत्न करताय, असा आरोपही त्यांनी केला. बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर दोष ढकलणे हे त्यांच्या राजकारणाचे नवे शस्त्र झाले आहे. पण जनता आता जागरूक आहे. ती ही नाटके ओळखते.
विश्वासाची लाट
बावनकुळेंनी सल्ल्याच्या सुरात टोमणा मारत म्हटलं, राहुलजी, तुम्ही रडगाणे बंद करा आणि आत्मपरीक्षण करा. इतक्या निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला स्पष्ट नकार दिला, त्यामागचं खरे कारण शोधा. आकडे उलटसुलट वाचून लोकांना गोंधळात टाकू नका. भाजपच्या युतीविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीला महाराष्ट्रात जनतेने भरघोस समर्थन दिलं आहे. ही विश्वासाची लाट आहे आणि ती पुढील निवडणुकीतही टिकून राहील. राहुल गांधी सातत्याने खोटं बोलून जनादेशाचा अपमान करत आहेत. जनता अशा वागणुकीला माफ करणार नाही.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे नवे नाहीत, पण जेव्हा इतिहास आणि आकडे बोलू लागतात, तेव्हा सत्तेसाठी केलेले आळसटलेले आरोप उघडे पडतात. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील संशयवृत्तीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आकड्यांनी सशक्त प्रत्युत्तर दिलं आहे, आणि हे प्रत्युत्तर फक्त राजकीय नसलं, तर सत्याच्या पारदर्शी आरशातलं प्रतिबिंब ठरावं, असं वाटतं.