मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या येस बँकेत शेतकऱ्याच्या जेसीबीच्या लिलाव तक्रारीनंतर तोडफोड करून बँकेच्या पाटीला काळे फासले.
महाराष्ट्रातील मराठी वादाचा भडका अजूनही शांत झालेला नाही. एकीकडे डान्स बारविरोधात मनसेचा आवाज अधिक तीव्र होत चालला आहे. तर दुसरीकडे नागपुरात मनसैनिकांनी येस बँकेवर वादग्रस्त आंदोलन उभारले. या घटनेने नागपूरच्या बँकिंग क्षेत्रात अक्षरशः खळबळ माजवली आहे. घटनेचा केंद्रबिंदू ठरला तो एका शेतकऱ्याचा जेसीबी. येस बँकेने त्याचा परस्पर लिलाव केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि थेट बँकेत घुसून आंदोलन उभारले. बँकेच्या पाटीला काळे फासण्यात आले. तर एका कर्मचाऱ्यालाही किरकोळ मारहाण झाली. या सगळ्यामुळे बँकेत एकच गोंधळ उडाला.
सदर शेतकरी काही काळापासून आपल्या जप्त केलेल्या जेसीबीसाठी प्रयत्न करत होता. त्याने बँकेकडे कर्जफेडीची तयारी दाखवली होती. मात्र तरीही त्याचा जेसीबी लिलाव करण्यात आला. त्यामुळेच तो मनसेकडे गेला आणि त्याची कैफियत ऐकून मनसे कार्यकर्त्यांनी येस बँकेच्या शाखेत धडक दिली. या धडक कारवाई दरम्यान बँकेच्या फलकाला काळं फासण्यात आले. घोषणाबाजी केली गेली आणि एका कर्मचाऱ्यावर हातसुद्धा उगारण्यात आला. बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. तर ग्राहकही गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. सध्या मनसे दोन प्रमुख मुद्द्यांवर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आहे.
सत्ताधाऱ्यांची टीका
मराठी भाषा आणि डान्स बार. सरकारी यंत्रणांमध्ये आणि खास करून बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीही आंदोलने केली होती. मराठीच्या सन्मानासाठी त्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. तर काही शाखांमध्ये हिंदी फलक काढून टाकण्यात आले होते. याच दरम्यान, रायगड जिल्ह्यात वाढत्या डान्स बारविरोधात राज ठाकरे यांनी सभा घेतली. त्यानंतर मनसैनिकांनी एका डान्स बारमध्येही धडक मारत तोडफोड केली. अशा पार्श्वभूमीवर येस बँकेवरील कारवाईने मनसेची रणधुमाळी अजून तीव्र केल्याचे स्पष्ट होते.
मनसेच्या या आक्रमक भूमिकेवर सत्ताधारी पक्षाच्या काही मंत्र्यांनी टीका केली आहे. खासकरून मंत्री भरत गोगावले यांनी डान्स बारवरून झालेल्या तोडफोडीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रात बार आहेत. पण सगळीकडे गैरप्रकार होत नाहीत. काही ठिकाणी खाण्या-पिण्याचे बार असतात, तर काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा. सगळ्या बारना एकाच माळेतील मणी समजू नका. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार योग्य त्या बारांवर कारवाई करेल. पण सर्वांवर एकच दोष ठेवणे अन्यायकारक ठरेल. यामागे सूचित केलेला मुद्दा स्पष्ट आहे, मनसेची कार्यपद्धती अनेकदा सीमारेषा ओलांडते.
Ashish Jaiswal : ड्रायव्हर सीटवरून मंत्रालयात घुमला न्यायाचा हॉर्न