राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून शरद पवारांनी 160 जागांच्या ऑफरचा गौप्यस्फोट केला. भाजप आमदार रवी राणा यांची तिखट प्रतिक्रिया.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच निवडणूक आयोगावर स्फोटक आरोप करताच राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी थेट सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी मतचोरी केली आहे. एवढेच नाही, तर कर्नाटकमधील एका मतदारसंघाचा दाखला देत त्यांनी ठोस पुराव्यांसह दावा मांडला. एका घरात एक व्यक्ती राहत असूनही तिथे तब्बल 40 जणांनी मतदान केल्याचे दाखवले गेले. या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मात्र काही थेट उत्तर दिले नाही. पण या विषयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरात मोठी प्रतिक्रिया देत सांगितले की, दिल्लीतील राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मी हजर होतो.
राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करुन गोष्टी मांडल्या. खरंच काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. आता आयोगाने त्यावर लक्ष घालायला हवं. याच वेळी शरद पवारांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये दोनजण भेटायला आले होते. 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी ते देत होते. ही ऑफर मला आणि राहुल गांधींना देण्यात आली. पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून त्याकडे दुर्लक्ष केले. या गौप्यस्फोटावर भाजप आमदार रवी राणा यांनी एकदम धारदार हल्ला चढवला. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. पण आता हताश झाल्याने, ते लोकशाहीवरच शंका घेऊ लागले आहेत.
भाजपला जनतेचा कौल
राहुल गांधी तर उठसूट सरकारवर आरोप करतात, कुठलाही मुद्दा नसतानाही त्याला बाऊ करतात. पण शरद पवारांनी तरी असे वक्तव्य करु नये, अशी जोरदार टीका रवी राणांनी केली. रवी राणा पुढे म्हणाले की, भाजपला महाराष्ट्रात आणि देशभरात वारंवार कौल मिळत आहे. जनता भाजपसोबत उभी आहे. काँग्रेस फक्त राजकारण करत राहिली आहे. शरद पवार यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. येत्या काळात ते नरेंद्र मोदींना केंद्रात साथ देतील, सरकारमध्ये सामील होतील आणि मोदी यांच्या नेतृत्त्वाला मान्य करतील, हे मी सांगतो. रवी राणांनी सुप्रिया सुळे यांच्या भेटींचाही मुद्दा उचलला. सुप्रिया सुळे नरेंद्र मोदींना अनेकदा भेटल्या आहेत.
लोकसभा अधिवेशन चालू असतानाही अनेक नेते पंतप्रधान मोदींना भेटत असतात. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह व नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, त्यात कुठलाही तणाव नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे शिंदे यांच्यामागे पूर्ण ताकदीने उभे आहेत. मुख्यमंत्री फडणवीसही शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मतभेद नसतानाही, विरोधकांकडून मुद्दाम मतभेद पसरवण्याचा खेळ सुरू आहे. रवी राणांच्या या स्पायसी भाषणानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Harshwardhan Sapkal : लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून टाका