राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला अजूनही सुरू आहे. वाशिम, अकोला, परभणीसह महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला गेल्या काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेत बदलांचे वारे वाहत असून, एकामागून एक आयएएस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. गेल्या आठवड्यातच सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले गेले होते. तर संजय कोलते यांना मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पुन्हा पाच नव्या नियुक्त्यांनी प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
तुकाराम मुंढे यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सुशील खोडवेकर यांनी असंघटित कामगार विकास आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. या बदल्यांच्या लाटेत वाशिम, अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारीपदांवर नवे चेहरे दिसणार आहेत. योगेश कुंभेजकर यांना वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले गेले, तर वर्षा मीना अकोलाच्या आणि संजय चव्हाण परभणीच्या जिल्हाधिकारीपदी विराजमान होणार आहेत. याशिवाय, भुवनेश्वरी एस. यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
Raju Timande : तुतारीचा सूर थांबला, आता दादांची घड्याळ वाजणार
जिल्ह्यांमध्ये विकासाची गाथा
रघुनाथ गावडे यांना मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रकाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या प्रशासकीय यंत्रणेला नवी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या बदल्यांमधील एक ठळक नाव म्हणजे भुवनेश्वरी एस. या 2015 वर्षाच्या बॅचच्या आयएएस अधिकारी तामिळनाडूतील मद्रासच्या रहिवासी आहेत. संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या भुवनेश्वरी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी, यवतमाळच्या पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकारी, नाशिक आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच नागपूर येथील स्मार्ट सिटी आणि वनामतीच्या महासंचालकपदाचा अनुभव त्यांच्या खात्यावर जमा आहे.
अलीकडेच त्या धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आता, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झालेल्या भुवनेश्वरी यांनी जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या गरजा लक्षात घेऊन लोककेंद्रित काम करणे हाच माझा उद्देश आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या बदल्यांचा झंझावात प्रशासकीय यंत्रणेत नवा उत्साह निर्माण करणारा ठरत आहे. योगेश कुंभेजकर, वर्षा मीना आणि संजय चव्हाण यांच्यासारखे अधिकारी आपल्या नव्या जिल्ह्यांमध्ये विकासाची नवी गाथा लिहिण्यास सज्ज झाले आहेत. रघुनाथ गावडे यांच्यासारखे अनुभवी अधिकारी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
सर्व नियुक्त्या आणि बदलांमुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यातही अशा बदल्या आणि नियुक्त्या यंत्रणेला नवसंजन देण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील, यात शंका नाही.
