महाराष्ट्र

बीड प्रकरणावरून सुरेश धस भेटले Ajit Pawar यांना

मस्साजोग येथील Santosh Deshmukh हत्येची धग कायम

Author

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलेच आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे हत्त्या प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हिवाळी अधिवेशनात निवेदन द्यावे लागले. मंगळवारी, 7 जानेवारी संतोष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कुणालाही सोडणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिले.

अशातच आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली, त्याबद्दल सुरेश धस यांनी माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या प्रश्नावर सुरेश धस यांनी उत्तर दिलं. वाल्मिक कराड या प्रकरतील संशयित मास्टरमाइंड असून, तो पोलिसांना शरण आला आहे, असे ते म्हणाले.

Action On वाल्मिक कराड

सुरेश धस यांनी 8 जानेवारी रोजी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर आरोप केले. सुरेश धस म्हणाले की, वाल्मिक कराडच्या सगळ्या गँग मोक्कामध्ये गेल्या पाहिजे. लाच घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला वाल्मिक कराडने वाचविले आहे. खाडे नावाच्या अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. त्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडने वाचवलं, असा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत या सगळ्यांची मालमत्ता किती आहे, हे देखील आपण जाहीर करणार, असे सुरेश धस म्हणाले.

अजित पवार यांच्याशी भेटीदरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केली, असे सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितले. आपण आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका म्हणजेच वाल्मिक कराड सगळ्यात आहे. वाल्मिक कराडची चौकशी करण्यात यावी. सातपुडा बंगल्यावर खंडणीबाबत बैठक झाली, हे आपण आजही खात्रीने सांगतो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचं ? हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवारांच्या हातात आहे, असेही सुरेश धस म्हणाले.

सुरेश धस पुढे म्हणाले, किशोर फड आणि संगीत दिघोळे यांच्या मातोश्री आणि पत्नींची भेट घेण्यासाठी आपण परळीला जाणार आहे. बीड जिल्ह्यात पाच वर्षांपासून काय चाललं आहे ते सगळ्यांना ठाउक आहे. धनंजय मुंडे यांना सर्व गोष्टींची माहिती आहे. आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला आहे, असेही सुरेश धस म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!