
कितीही वैर असलं तरी एकमेकांच्या सुख, दु:खात धावून जाणं ही मराठी संस्कृती. यालाच माणुसकी असं म्हटलं जातं. अशीच माणुसकीची भावना जपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या अडचणीत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. या पराभवाचं खापर आता नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणूक पराभूत झालेले ऋषीकेश ऊर्फ बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर आरोपांची तोफ डागली. त्यानंतर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनीही नानांवर आरोप केला. राज्यभरात हा आरोप होत असतानाच नितयतीनं देखील नानांवर मोठा आघात केला. पटोले यांच्या मातोश्रींचं नुकतच निधन झालं. आईचं छत्र हरवल्यानंतर कणखर बाणा असलेले नाना हमसून हमसून रडले. शोकमग्न असलेल्या नाना पटोले यांची शुक्रवारी (10 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
चंद्रपूर येथे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली. चंद्रपुरातील कार्यक्रम आटोपल्यानंर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. फडणवीसांचं हेलिकॉप्टर थेट नानांच्या गावी लॅन्ड झालं. त्यानंतर फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यासह पटोले परिवाराची भेट घेतली. नानांसह फडणवीस यांनी पटोले परिवाराचं सांत्वन केलं. त्यानंतर बराच वेळपर्यंत नाना आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरू होती. पटोले यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर राज्यभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. भंडाऱ्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके, सुनिल मेंढे यांच्यासह सर्वच नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजुला सारत पटोले यांच्या दु:खात त्यांना साथ दिली. त्यानंतर आता फडणवीस यांनीही माणुसकी जपत पटोले यांच्या निवासस्थानी भेट दिली.

माणुसकी की दोस्ताना?
देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले हे जवळचे मित्र असल्याचं सातत्यानं बोललं जातं. विधानसभा निवडणुकीनंतर तर नाना पटोले यांच्यावर थेट भाजपला मदत केल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळं काँग्रेसमधील नाना विरोधी गट सक्रिय झाला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर थेट नानांच्या गावी लॅन्ड झाल्यानं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पटोले विरोधी गट फडणवीसांच्या या भेटीच्या मुद्द्याचं नक्कीच भांडवल करेल असं सांगण्यात येत आहे. राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नागपुरात फडणवीस यांना भेटले. ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली.
राज्यातीन अनेक नेते फडणवीस यांच्या भेटीसाठी धावाधाव करीत असताना देवाभाऊ मात्र पटोले यांच्या भेटीसाठी स्वत: गेले. त्यामुळं या भेटीमागं नेमकं दडलय काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वरकरणी ही भेट केवळ माणुसकीच्या भावनेतून असल्याचं दिसत असली तरी याचे अनेक जण राजकीय अर्थ काढत आहेत. नाना पटोले हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी भाजपमध्येच होते. पटोले भाजपचे खासदारही होते. खासदारकीचा राजीनामा देत ते काँग्रेसमध्ये आलेत. काँग्रेसमध्ये येताक्षणी त्यांना राहुल गांधी यांनी मोठी जबाबदारीही दिली. पटोले भलेही भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेत, पण भाजपमधील आपल्या जुन्या मित्रांना ते विसरलेले नाहीत. फडणवीस हे देखील भाजपमधील त्या काळचे पटोले यांच्या सहकाऱ्यांपैकी एक. त्यामुळं ‘ना.. ना.. करते..’ फडणवीस आजही पटोलेच्या प्रेमात तर नाहीत ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.