
मुख्यमंत्री पदावर नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होताच पुन्हा एकदा नागपूरच्या विकासानं जोर धरला आहे.
रुपेरी पडद्यावर अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यामध्ये बडे मियाँ लंबी लंबी टांगे टाकत कबड्डीचा खेळ खेळताना दिसतो. छोटे मियाँ देखील फास्ट कबड्डी खेळत अनेकांना चारोखाने चित करतो. या चित्रपटातील ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्ला’ या गितातून दोघांचही काम किती जबरदस्त आहे, हे दाखविण्यात आलं. उपराजधानी नागपूरनंही अशीच ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ची जोडी मध्यंतरी अनुभवली. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे ते राजकारणातील ‘बडे मियाँ, छोटे मियाँ.’
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. त्याचवेळी नितीन गडकरी हे केंद्रात दळवळण मंत्री होते. फडणवीस-गडकरी या दोघांनी मिळून नागपूरलाच नव्हे तर अख्ख्या देशाला वेगानं विकास काय असतो ते दाखवून दिलं. स्वप्नवत वाटणारी नागपूर मेट्रो वेगानं रुळांवरून धावू लागली. नवे रस्ते झालेत. अडचणीचे ठरणारे कायदे, नियम कचऱ्याच्या डब्यात फेकून या दोघांनी नागपूरचा असा विकास केला की सगळ्यांचे डोळेच विस्फारले. राजकीय इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नाही हे या दोन्ही विदर्भप्रेमी सुपुत्रांनी दाखवून दिलं.

मौके पर चौका
कोणताही चांगला क्रीडापटू योग्य क्षणाची प्रतीक्षा करीत असतो. क्रिकेटमध्येही ‘मौका देख के चौका’ मारला जातो. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनीही राजकीय खेळाच्या मैदानावर योग्य क्षणाची अनेक वर्ष प्रतीक्षा केली. अनेक वर्षांपासून हे दोन्ही नेते विदर्भावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढत होते. विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठी ते संघर्ष करीत होते. प्रसंगी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाही सक्रिय सहभाग घेतला. मराठी मुलुखाचे दोन तुकडे करणं हा या दोन्ही नेत्यांना हेतू अजिबात नव्हता. विदर्भाच्या मागासलेपणाची ‘बस ये सूरत बदलनी चाहिए’ हाच त्यांचा प्रामाणिक हेतू होता. त्यामुळं सत्तेच्या सारीपाटात आपले मोहरे बलवान होताच गडकरी-फडणवीस यांनी विदर्भाकडं विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष करणाऱ्यांना शह आणि मात दिली.
मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाची एक्स्प्रेसच चालविली. छोटे मियाँ म्हणून फडणवीस गडकरींची साथ मागत गेले. बडे मियाँ म्हणून गडकरींनीही ‘हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे..’ म्हणत फडणवीसांच्या प्रयत्नांना बळ दिलं. त्यामुळं नागपूरचा पूर्ण ‘मेकओव्हर’ झाला. विकासाच्या बाबतीत कामांची एक्स्प्रेस वेगांन धावली. उद्योगांच्या बाबतीत संत्रा नगरीनं उचं भरारी घेतली. नागपूरचा कानाकोपरा बदलत गेला. त्यामुळं नागनदीच्या तिरावर असलेल्या एकेकाळच्या छोट्या गावाला नवी ‘समृद्धी’ प्राप्त झाली. आता पुन्हा एकदा असाच योग जुळून आला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. नितीन गडकरी यांचेही ‘हौसले बुलंद’ आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा नागपूरच्या विकासासाठी राजकारणातील हे ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ एकत्र येतील यात शंकाच नाही.
काही थेंब तिकडेही पडू द्या!
गडकरी-फडणवीस यांनी नागपूरचा विकास करावा यात दुमतच नाही. नागपूर म्हणजे भारताचं हृदयस्थान. ‘झिरो माइल’चं गाव. पण विदर्भातील अनेक जिल्हे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. बुलढाण्यापासून अमरावतीपर्यंतचा पट्टा अद्यापही नागपुरातील या दोन्ही दिग्गजांकडं आशेने पाहात आहे. भंडाऱ्यापासून गडचिरोलीपर्यंतच्या भागाला एका भगिरथाची प्रतीक्षा आहे. असा भगिरथ जो विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत आणेल. विदर्भातील उर्वरित दहा जिल्हे आजही विकासाच्या बाबतीत तहानलेले आहेत. गडकरी आणि फडणवीस या जोडीनं विकासमृताचे काही थेंब जरी या जिल्ह्यांत टाकले तर दुधात साखर पडल्यासारखं होईल. त्यामुळं या दोन्ही मातब्बर नेत्यांनी यंदाच्या ‘टर्म’मध्ये विदर्भाच्या उर्वरित दहाही जिल्ह्यांना परीसस्पर्श करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.