
अतिआत्मविश्वासानं काँग्रेसचा घात केला आहे. पण हे सत्य स्वीकारण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी ईव्हीएमच्या विषयावर रडत बसल्याची टीका माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं जनतेची पूर्ण ताकदीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही मंडळी जनतेशी धादांत खोटी बोलली. संविधानच बदलणार अशी भीती त्यांनी लोकांना दाखविली. पण त्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात सत्तारूढ झालं. सरकारचं काम पाहिल्यानंतर जनतेला खरं काय ते कळलं. त्यामुळं जनतेनं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली. पक्षासाठी काम करण्याची वेळ होती त्यावेळी राहुल गांधी देशभर फिरत होते. आधीच जोडून असलेल्या भारताला जोडण्याचं नाटक ते करीत होते. ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यापासून अनेक वर्ष जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं ठेवलं ते ‘भारत जोडो’ बद्दल बोलत होते, अशी टीका माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूक काँग्रेसनं पराभूत केलं. त्यांना भारतरत्न या सन्मानापासून वंचित ठेवलं. अशा काँग्रेसनं संविधान धोक्यात असल्याच्या वल्गना दिल्या. ही बनवेगिरी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या लक्षात आली. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व काँग्रेसला आपली जागा दाखवून दिली. आता राहुल गांधी आणि त्यांचे चेलेचपाटे ईव्हीएमच्या नावानं खडे फोडत आहे. ईव्हीएमचा वापर देशात सुरू झाला त्यावेळी काँग्रेसचं सरकार होते. 2014 पर्यंत ईव्हीएम व्यवस्थित होती. पण अचानक ईव्हीएम हॅक होणं कसं काय सुरू झालं, असा सवालही डॉ. फुके यांनी उपस्थित केला.

जनता दुधखुळी नाही
देशातील काही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या राज्यांमध्ये ईव्हीएम हॅक होत नाही. पण जिथे काँग्रेस पराभूत होते, त्यासाठी ही मंडळी ईव्हीएमच्या नावानं अश्रू गाळण्यास सुरुवात करतात, असंही फुके म्हणाले. मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पराभवावर मंथन करण्यासाठी वेळ काढावा. कोणतंही उपकरण हॅक करायचं असेल तर ते इंटरनेटने किंवा एखाद्या वायरलेस तंत्रज्ञानानं जोडलेलं असणं गरजेचं आहे. त्यामध्ये चीप असावी लागते. ही बाब अगदी प्राथमिक शाळेत संगणक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यालाही शिकवली जाते. पण काँग्रेस अन् महाविकास आघाडीकडून होणाऱ्या हॅकिंगचा आरोप हास्यास्पद असल्याचं डॉ. फुके म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदार वाढल्याचा आरोप होत आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. तेलंगाणच्या निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम एकदम ओके होते. महाराष्ट्रात पराभव झाला तर ईव्हीएम हॅक कसं झालं, असा सवालही डॉ. फुके यांनी केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील जनता स्वाभाविकपणे महायुतीला निवडेल असं चित्र होतं. महाविकास आघाडीचं नेते मारो, काटो, एक तर तू नाही तर मी अशी भाषा करीत होते. त्यांच्याजवळ विकासाचं व्हिजनच नव्हतं. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार होतं. तीन तिघाडा अन् महाराष्ट्राच्या विकासाचा बिघाडा झाला. कोविड लॉकडाऊनच्या झळा लोकांनी भोगल्या होत्या. महाविकास आघाडीनं काहीच केलं नाही, हे जनतेला ठाऊक होतं. त्यामुळं काँग्रेसचा पराभव झाला, असं डॉ. फुके म्हणाले.
अडीच वर्षात विकास
महायसुतीच्या सरकारनं अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास करून दाखविला. बहिणींना आर्थिक सक्षम केलं.बहिणींसाठी योजना येताच काँग्रेसच्या पोटात दुखलं. त्यांनी आपल्या चट्ट्याबट्ट्यांना कोर्टात केस दाखल करायला लावली. हे सगळं महाराष्ट्रातील जनता बघत होती. जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेस अन् महाविकास आघाडीनं केलं. हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. त्यामुळं जनतेनं सुडानं पेटलेल्यांची ‘मशाल’ विझवली. खालच्या पातळीचं राजकारण करणाऱ्यांच्या ‘तुतारी’ची पुंगी वाजवली. जातीवाद पसरविणाऱ्यांचा ‘हात’ सोडला. महायुतीला साथ दिला, असं ठामपणं डॉ. परिणय फुके यांनी नमूद केलं.
भाजपचे मार्गदर्शक देवेंद्रफडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप केले नाही. त्यांनी कारणांचा शोध घेतला. रात्रंदिवस एक केला. त्यानंतर महायुतीसाठी विजय खेचून आणला. कुठे चूक झाली याचा अभ्यास केला. त्यातून विधानसभा निवडणुकीत दुरूस्ती करून नव्या दमानं निवडणुकीला सामोरे गेले. त्यानंतरच हे यश मिळालं. काँग्रेस आणि महायुती केवळ आरोप करीत हवेत गोळीबार करीत आहे. त्यांना ईव्हीएम हटवायचे आहेत. त्यानंतरच त्यांना पुन्हा ‘बुथ कॅप्चरिंग’सारखे प्रकार करता येतील. बॅलेट बदलविता येतील. भारतातील जनता पूर्वीच्या निवडणुकीत झालेले हे गैरप्रकार विसरलेली नाही. त्यामुळं राहुल गांधी यांनी हे स्वप्नरंजन करण्यापेक्षा विचारमंथन करावं, असं डॉ. परिणय फुके म्हणाले.