महाराष्ट्र

Bachchu Kadu: दोन आठवड्यांची मुदत, पण अध्यक्षपदावरची टांगती तलवार

Amravati: उत्तर देण्यासाठी बच्चू कडूंना दोन आठवड्यांची मुदत

Author

सहकार विभागाच्या नोटीसमुळे बच्चू कडू यांच्या अध्यक्षपदावर संकट निर्माण झाले आहे. मात्र, त्यांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतेच त्यांना सहकार विभागाकडून मोठी नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावर गडगड होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, आता त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे, कारण नोटीसीला उत्तर देण्यासाठी त्यांना आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

मुळात ही संपूर्ण अडचण उद्भवली ती नाशिक न्यायालयाच्या निर्णयामुळे. 2017 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. यावर विशेष न्यायालयाने 2021 मध्ये त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यांना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Maharashtra Politics : शिंदेंच्या संकटांवर अमोल मिटकरींचा तडका 

विरोधकांचा दबाव

बच्चू कडूंविरोधात जिल्हा बँकेतील विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बँकेच्या नियमानुसार, कोणत्याही संचालकाला जर न्यायालयाने एक वर्षापर्यंत शिक्षा सुनावली असेल, तर तो पदावर राहू शकत नाही. या नियमाचा आधार घेत बारा संचालकांनी त्यांना हटवण्याची मागणी केली होती. सहकार विभागाने तक्रारीची दखल घेत कडूंना नोटीस पाठवली आणि 24 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. मात्र, आता त्यांना दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे.

याच पार्श्वभूमीवर, बच्चू कडू यांच्या अध्यक्षपदाला धोका निर्माण झाला आहे. विरोधी गटाने त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली असून, भाजपही त्यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांची राजकीय ताकद कमी झाल्याचेही बोलले जात आहे.

Baramati: दादा’ विरुद्ध ‘साहेब’ – कोण गोड, कोण कडू

देशमुख गटाचा हल्लाबोल

बच्चू कडूंनी एकेकाळी काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना जिल्हा बँकेतील सत्तेपासून रोखले होते. त्यावेळी त्यांनी बबलू देशमुख गटातील तीन संचालकांना फोडून आपल्या बाजूने वळवले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या राजकीय प्रभावाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे बबलू देशमुख आणि त्यांचा गट आता कडूंना बँकेच्या सत्तेवरून हटवण्याच्या तयारीत आहे.

सहकार विभागानेही त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. विभागीय सहनिबंधकांनी त्यांच्या नोटीसीत स्पष्टपणे विचारले आहे की, बच्चू कडूंना संचालक पदावरून का निलंबित केले जाऊ नये? त्यामुळे कडू यांना आता आपली बाजू भक्कमपणे मांडावी लागणार आहे.

Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी

बच्चू कडूंची कसोटी

सध्या बच्चू कडूंसाठी ही लढाई महत्त्वाची आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नाशिक न्यायालयाच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली आहे. यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, बँकेच्या नियमानुसार, त्यांना अध्यक्षपद गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील दोन आठवडे आता त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. जर सहकार विभागाने त्यांचे उत्तर समाधानकारक न मानले, तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. विरोधकांनी त्यांच्यावर असलेला दबाव अधिक वाढवला असून, भाजप आणि बबलू देशमुख गट त्यांना हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!