यंदाचं अधिवेशन वाया गेले. मुख्यमंत्री आणि विरोधकांना प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
महाराष्ट्र विधिमंडळात उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मंत्र्यांचे राजीनामे, अटक, आरोप-प्रत्यारोप, खोचक टीका अशा घटनांनी संपूर्ण अधिवेशन गाजवले. मात्र, अधिवेशनाचा उद्देश साध्य झाला का, हाच मोठा प्रश्न आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडले आणि राजकीय वादविवादांना अधिक महत्त्व मिळाले असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांनी या अधिवेशनाला ‘वाया गेलेले’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते, मुख्यमंत्री आणि विरोधक दोघांनाही योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा न होता अवांतर विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांची निवड सरकार रोखून धरत आहे, कारण विरोधकांकडे मोठे भ्रष्टाचार प्रकरणे उघड करण्याची ताकद आहे, असेही खडसे यांनी नमूद केले.
हरवलेला उद्देश
दहा मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात अनेक महत्त्वाच्या योजना अपेक्षित होत्या, मात्र त्यावर चर्चा झालेली नाही असा आरोप केला गेला. विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बहिणींमध्ये नाराजी पसरली. विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, पण हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला नाही.
यंदाच्या अधिवेशनात राजकीय नाट्याच्या अनेक घडामोडी रंगल्या. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही जोरदार चर्चा रंगली. परिणय फुके यांनी गडचिरोलीतील धान माफियांच्या प्रश्नावर आवाज उठवत अधिवेशनात खळबळ माजवली. सर्वाधिक गाजले ते अबू आझमीच्या औरंगजेबसंबंधी केलेल्या वक्तव्यावरून. नागपुरातील दंगलीवरूनही सभागृह तापले. अधिवेशनाच्या अखेरीस एकनाथ शिंदेंवर झालेल्या गद्दारीच्या टीकेनेही चांगलाच धुरळा उडवला आणि प्रशांत कोरटकरला अटकही झाली.
अधिवेशनाचा शेवट
अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच याची औपचारिक घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेकदा हा मुद्दा विधिमंडळात मांडला, पण अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
गेले दोन अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडली आहेत, त्यामुळे विरोधक आता आक्रमक होत आहेत. अधिवेशनाचा शेवटचा दिवस २६ मार्च रोजी राजधानीत पार पडत आहे. अधिवेशनानंतर दोन्ही पक्ष पत्रकार परिषद घेणार असल्याचे समोर आले आहे. यात कोणती विधेयके मंजूर झाली, कोणते मुद्दे थंडावले, हे यातून स्पष्ट होईल.
