
उपराजधानी ते राजधानी पर्यंत समृद्धी महामार्गाचा विकास प्रत्यक्षात आल्यानं राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. मात्र हा विकास संपूर्ण महाराष्ट्रात पसरावा यासाठी भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढे आले आहेत.
राजकारणाच्या द्रुतगती मार्गावर 6 जून रोजी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन भव्य सोहळ्यात पार पडले. या समृद्धीमुळे उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई जो विकासाचा वेग आहे तो आता समृद्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गामुळे व्यापाऱ्याला चालना मिळालेली आहे. लोकांच्या प्रवासाचा वेळ वाचला आहे.
शेतकरी देखील समृद्ध झाला आहे. ज्याचं कारण आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाची वेगाने वाहतूक होऊ लागली. आता विकासाच्या या गंगेने गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला देखील पावन करावे अशी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी राजकारणातले हे भगीरथ पुढे सरसावले आहेत. हा विकास केवळ आपल्या मतदारसंघापुरता म्हणजे भंडारा आणि गोंदिया जिल्हापुरता मर्यादित राहू नये, तर तो महाराष्ट्राचा दुर्गम टोक असलेल्या गडचिरोलीच्या गरीब आदिवासींपर्यंत पोहोचावा अशी प्रामाणिक कळकळ आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मनामध्ये दिसत आहे.

प्रवास जलद सुरक्षित
डॉ फुके यांनी त्यातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साध घातली आहे. जेणेकरून समृद्धी महामार्गाचा अजून विस्तार व्हावा. देवेंद्र फडणवीस हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाही तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तरी विकास काय आणि कसा होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दाखवून दिलेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरचा प्रचंड मेक ओव्हर झालेला आहे. आता त्याच देवाभाऊंनी जर मनात आणलं तर गडचिरोलीमध्ये एकही कच्चा रस्ता राहणार नाही असा विश्वास डॉ. परिणय फुके यांना आहे.
आतापर्यंतचा पूर्व राजकीय इतिहास पाहता डॉ. परिणय फुके यांनी देवाभाऊंकडे काही मागितलं आणि ते मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही असं अजिबात झालेलं नाही. त्यामुळे विकासाची गंगा गडचिरोली पर्यंत आणण्यासाठी तपश्चर्येला सुरुवात केलेल्या डॉ. परिणय फुके यांना देवाभाऊ लवकरच पावतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इगतपुरी ते ठाणे (आमणे) हा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू झाल्याने नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित बनला आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा आणि नव्या युगाची सुरुवात आहे, असं मत डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केलं.
Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सत्ताधाऱ्यांचे जुलूम
डॉ. फुके यांच्या मते, या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ तर कमी होईलच, पण स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंद्यांना नवे बळ मिळेल आणि ग्रामीण भागाच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.