मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादानंतर भाजपकडून ओबीसी समाजाला कोणताही धक्का होणार नाही, असे सातत्याने केलेल्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शासकीय निर्णय जाहीर केला. पण या निर्णयाने ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. काही ओबीसी नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 शासकीय जयंती सोहळ्यात सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजाला कोणताही धक्का लागणार नाही, असा ठाम विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे, त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. सरसकट प्रमाणपत्रांचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात फडणवीसांनी ओबीसी समाजाला आश्वासक संदेश देताना सांगितले की, सरकार त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ‘तुम्ही मागत राहा, आम्ही शक्य तेवढे देत राहू,’ असे आश्वासन देत त्यांनी ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटमधील नोंदींचा आधार घेत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंग्रजांनी जे केले, ते आम्ही करणार नाही. एकाच्या ताटातील काढून दुसऱ्याला देण्याची नीती आमची नाही, असे ठणकावताना फडणवीसांनी सरकारची सामाजिक समतोलाची भूमिका स्पष्ट केली.
सामाजिक समतेचा संदेश
फडणवीसांनी या सोहळ्यात क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पराक्रमाला उजाळा दिला. रामोशी समाजाचा श्रीरामाशी थेट संबंध आहे. उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिला बिगुल वाजवला. त्यांनी सेना उभी करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले, असे सांगताना त्यांनी उमाजी नाईकांना ‘शिवाजी महाराजांचा वारसा’ संबोधले. इंग्रज इतके घाबरले की त्यांनी उमाजी नाईकांना दुसरे शिवाजी महाराज संबोधले. पण फितुरीमुळे त्यांना पकडण्यात आले आणि फाशी देण्यात आली. तरीही रामोशी समाजाची लढाई थांबली नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी इंग्रजांनी रामोशी समाजाला गुन्हेगार ठरवून 80 वर्षे मागे ढकलल्याचा इतिहास उलगडताना, आता सरकार या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
इतिहासाने या समाजाचा गौरवशाली वारसा दडवला, पण आता आम्ही त्यांना त्यांचे खरे स्थान देऊ, असे फडणवीसांनी ठासून सांगितले. राजे उमाजी नाईक महामंडळाच्या माध्यमातून रामोशी समाजाला 15 लाखांपर्यंत कर्ज आणि दोन लाखांपर्यंत बिगर तारण कर्ज देण्याची योजना जाहीर करत त्यांनी समाजाला नोकरी देणारा बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. महाज्योतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देऊन या समाजाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले. फडणवीसांनी या मंचावरून सामाजिक समतेचा संदेश देताना सांगितले की, ओबीसी आणि मराठा समाजात कोणतीही भेदभावाची भावना ठेवली जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
