
महाराष्ट्रातील भाजपमध्ये लवकरच बदल होणार आहे. सध्या संघटन पर्व प्रभारी असलेले रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी कॅबिनेट मंत्रिमंडळात लागली. त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आलं आहे. भाजपच्या नियमाप्रमाणं एका व्यक्तीकडं सहसा दोन पदं ठेवली जात नाही. त्यामुळं महसूल मंत्री होताच बावनकुळे यांचा उत्तराधिकारी कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना संघटन पर्व प्रभारी अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षांप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आता लवकरच रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची चिन्हे आहेत. याची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.
चव्हाण यांनाच पूर्णवेळ अधिकार देऊन कार्यकारी अध्यक्ष करण्यात येणार असल्यानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा आता जवळपास संपुष्टात आल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. बावनकुळे यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या जागेवर दमदार नेता अध्यक्ष म्हणून नेमला जाणार आहे. राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक आता होणार आहे. त्यात मुंबई महापालिकेवर ताबा मिळविणं भाजपसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुरून उरणारा अध्यक्ष मुंबई भाजपला द्यावा लागणार आहे.

एक उपमुख्यमंत्री कोमात, दुसरा कोमातून बाहेर; Vijay Wadettiwar यांची टीका
अनेक जण स्पर्धेत
काँग्रेसमध्ये मुंबईची जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडं आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं भाजपचा खरा लढा शिवसेनेसोबतच राहणार आहे. परिणामी शेलार यांच्यासारखा दमदार अध्यक्ष भाजप शोधत आहे. शेलार ऑगस्ट 2022 पासून मुंबईची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्यानंतर मुंबै बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे. याशिवाय अलीकडेच अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अलवाणी, संजय उपाध्याय ही नावंही चर्चेत आली आहेत. ही सर्व मंडळी मुंबईती आमदार आहेत. यातील उपाध्याय यांचे नाव म्हणजे उत्तर भारतीय चेहरा आहे.
संजय उपाध्याय यापूर्वी मुंबई भाजपचे सरचिटणीस होते. याशिवाय अमित साटम यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे. संघटन पर्व संपल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल शक्य आहेत. 29 महापालिका, 228 नगर परिषद, 29 नगर पंचायत, 26 जिल्हा परिषद आणि 289 ग्रामपंचायतीची निवडणूक अद्याप बाकी आहे. त्यामुळं प्रदेश पातळीपासून बुथ पातळीपर्यंत अनेक बदल भाजप करणार आहे. विदर्भाचा विचार केला तर अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर महापालिकेवर सत्ता मिळविणं भाजपसाठी महत्वाचं आहे. सध्या यातील तीन ठिकाणी भाजपला मोठी मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळं प्रदेश पातळीपासून ग्रामीणस्तरापर्यंत कोणते आणि कसे बदल होतात, यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.