महाराष्ट्र

Amravati : महापालिकेच्या रणभूमीत महायुतीचे दोन सेनापती आमने-सामने

Local Body Elections : सत्तेच्या गाभाऱ्यात संघर्षाचे चक्रीवादळ 

Author

अमरावतीत महापालिकेच्या रणसंग्रामाचं ढोल बडवलं जात असताना, महायुतीतले दोन बलाढ्य सेनापती खोडके आणि राणा दांपत्य समोरासमोर ठाकले आहेत. एकमेकांच्या छायेत न जगणाऱ्या या दोन गटांच्या संघर्षाने महायुतीच्या एकसंधतेला हादरा दिला आहे.

राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच, अमरावतीच्या राजकारणात जुनी वैरं पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहेत. महायुतीतील दोन दिग्गज नेते आमदार संजय खोडके आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा रंगत घेत आहे. या राजकीय जुगलबंदीने अमरावतीतील सत्तेच्या गणितांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत.

महायुतीत सामंजस्याचा सूर दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असला, तरी जमिनीवर मात्र एक वेगळीच तस्वीर पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांनी भाजपच्या पाठिंब्याने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला. परंतु त्यांचे पती, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. कारण अद्याप रवी राणा यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

राजकीय खेळी 

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संजय खोडके यांनी राणा दांपत्यासोबत सुसंवाद अशक्य असल्याचे जाहीर करत थेट महायुतीच्या नेतृत्वालाच अलिप्ततेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राणा विरुद्ध खोडके असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. हा संघर्ष अमरावतीसाठी नवा नाही. लोकसभा निवडणुकीत खोडके यांनी महायुतीत असतानाही नवनीत राणा यांना विरोध केल्याचा आरोप राणा समर्थकांनी केला होता. त्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, नवनीत राणा यांच्या गटाने महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांच्या विरोधात बंडखोर भाजप नेते जगदीश गुप्ता यांना पाठिंबा दिला होता, असा आरोपही झाला होता.

हे दोघंही महायुतीत असूनही एकमेकांविरोधात स्पष्ट भूमिका घेत असतात, हे त्यांच्या समर्थकांसाठी नवे नाही. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धग अधिक तीव्र होताना दिसते आहे. दोघांनाही आपापली राजकीय ताकद सिद्ध करायची आहे, आणि म्हणूनच या निवडणुकीत ही टक्कर अधिकच रोचक ठरणार आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 87 पैकी 45 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती, तर युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्या काळात संजय खोडके काँग्रेसमध्ये होते, आणि डॉ. सुनील देशमुख भाजपमध्ये. आज मात्र भूमिका उलटली आहे, देशमुख काँग्रेसमध्ये परतले आहेत, आणि खोडके आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत.

वाद चव्हाट्यावर

नवनीत राणा यांना भाजपने पराभवाच्या छायेतूनही प्रतिष्ठा दिली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार, हे स्पष्ट दिसते आहे. दरम्यान, माजी विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे त्यांचा गट काय भूमिका घेतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या छत्राखाली असूनही घोडके आणि राणा दांपत्याच्या संघर्षाने अमरावतीत राजकीय वीजेचे तार ताणले गेले आहेत. मतभेदांच्या या भूकंपात कोणाची बाजू जिंकते आणि कोणाची धरणे ढासळतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. एक मात्र नक्की, ही निवडणूक केवळ मतांची नव्हे, तर प्रतिष्ठेची आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!