
अकोल्यातील शिवसेना पक्षात गेल्या काही दिवसांपासून राजकीय अंतर्गत मतभेद तीव्र स्वरूपात दिसून येत आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, गोपीकिशन बाजोरिया यांच्या संपर्क नेते पदावर सध्या तणाव आणि अनिश्चितता वाढली आहे.
अकोल्यातील शिवसेनेत गेले काही महिने सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सध्या तणावाचे वातावरण अधिकच तापले आहे. माजी आमदार आणि अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यशैलीवर पक्षातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. याआधीच त्यांच्या विरोधात पुतळा जाळण्याची घटना घडली होती. आता पुन्हा आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पक्षांतर्गत अस्वस्थता इतकी वाढली आहे की सामान्य कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत या वादाच्या झळा पोहोचल्या आहेत.
अकोल्यात भाजपमधून नारायण गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे यांना गोपीकिशन बाजोरिया यांनी पक्षात आणून थेट जिल्हाध्यक्षपद दिलं. हे स्थानिक नेते आणि शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलं. कोणतीही माहिती न देता बाहेरच्या नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे सगळं प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की, पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या संपर्कप्रमुखाच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रीय नेतृत्व देखील सतर्क झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी आता या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.

Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली
विधानसभा पराभवाचा परिणाम
शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी द लोकहित लाइव्ह सोबत बोलतांना सांगितले की अकोल्याची संपूर्ण जबाबदारी आता बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. स्थानिक शिवसैनिकांचा जाधव यांच्याशी अत्यंत मधुर संबंध आहे. म्हणजेच अत्यंत विश्वासार्ह, जमिनीवर काम करणारा नेता. बाजोरिया यांच्या कार्यशैलीविषयी वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या विधानसभेची जबाबदारी बाजोरिया यांच्याकडे आहे. तर लोकसभेच्या पातळीवरील शिवसेनेची धुरा प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला आणि संपर्क प्रमुख म्हणून वडीलधारी कर्तव्य प्रामाणिकपणे न निभावल्याने ही दोन्ही कारणं बाजोरिया यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे.जिल्ह्याची जबाबदारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी यांचे गोळा बेरीज करून कदाचित बाजोरिया यांना काकांच्या जागी आणि काकांना बाजोरिया यांच्या जागी नेमले जाऊ शकते. स्थानिक पातळीवर जाधव आणि कार्यकर्त्यांमधील नातं काका-पुतण्यासारखं आहे. जाधव ‘काका’ म्हणून ओळखले जातात आणि कार्यकर्ते त्यांचं ऐकतात. अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपला धनुष्यबाण कायम ठेवण्यासाठी शिंदे साहेब कदाचित काकांवर मोठी जबाबदारी देऊ शकतात अशी दाट शक्यता आहे.
शेवटी, या वादावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील. जर प्रतापराव जाधव यांच्याकडे अकोल्याची जबाबदारी देण्यात आली नाही, तर ती मुंबईतील एखाद्या वरिष्ठ नेत्याकडे सोपवली जाऊ शकते. मात्र, अशी शक्यता अत्यंत क्षीण असल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे. प्रतापराव जाधव यांची कामगिरी, कार्यकर्त्यांशी असलेलं नातं आणि पक्षाच्या गरजेनुसार तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता बघता अकोल्याचा लगाम त्यांच्याच हातात दिला जाऊ शकतो.