
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत त्यांना सत्तेसाठी लाचार असल्याचा आरोप केला.
राज्याच्या सत्तासमीकरणात पुन्हा एकदा नाट्यमय रंग चढताना दिसतो आहे. 19 जून रोजी शिंदे गटाने आपला वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. पण या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपली ऊर्जा केवळ उत्सवात खर्च न करता थेट राजकीय हल्ल्याच्या दिशेने वळवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावर त्यांनी एकामागून एक जळजळीत टोले लगावले. आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, अशा शब्दांत शिंदेंनी सुरुवातीलाच ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं.
हिंदुत्वाचा भगवा आमच्याकडे आहे. शिवधनुष्य आमच्याकडे आहे. जनतेचा आशीर्वादही आमच्याकडेच आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी आपल्याच बाजूने जनमत असल्याचा दावा केला.एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सत्तेच्या खुर्चीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सत्तेसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत, ज्यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकलं, असा आरोप केला.

Yashomati Thakur : सत्ताधाऱ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक घोटाळ्यांचे धडे
हिंदुत्व आमचा श्वास
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार? यासह, हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही त्याची कधीही प्रतारणा करणार नाही, असं म्हणत त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा आपल्या गटाकडे असल्याचं पुन्हा एकदा पटवून दिले दिले.शिंदेंनी आपल्या भाषणात केवळ टीका केली नाही, तर सवालांची मालिकाही उघडली. बाळासाहेबांनंतर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? असा थेट सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त बौद्धिक हल्ला केला.
उद्धव ठाकरे यांच्या ‘कमॉन, कील मी’ या विधानावर शिंदेंनी फटकारताना म्हटलं, मेलेल्या माणसाला काय मारणार? महाराष्ट्राच्या जनतेनं तुमचा मुडदा विधानसभेत पाडलेलाच आहे. यासोबतच त्यांनी ‘वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्यासाठी वाघाचं काळीज आणि मनगटात जोर लागतो,’ अशी उपमा देत आपले शिवसैनिक वाघासारखे असल्याचा संदेश दिला.शेवटी, शिंदें आपल्या शैलीत इशारा देत म्हणाले, आमच्या नादाला लागू नका. तुमचा चांगा पलटी, घोडं फरार आम्ही केलं आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख करत स्वतःला त्यांचा सच्चा वारसदार असल्याचंही ठामपणे सांगितले.
शिंदेंच्या या भाषणाने ठाकरे गटाविरुद्धचा संघर्ष पुन्हा पेटला असून, वर्धापन दिनाचा उत्सव केवळ आनंदाचा नव्हता, तर एक हिवाळी रणसंग्रामही ठरला, हे नक्की.