महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रणांगण सज्ज होत असताना, दुसरीकडे महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये अंतर्गत कलह निर्माण होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकीचा धुमाकूळ उडाला आहे. यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इतकी चुरशीची होणार आहे की, पक्षांतर, पक्षांतर्गत कलह आणि एकमेकांवर तोंडसुख घेण्याच्या घटना रोजच्या रोज समोर येत आहेत. महाराष्ट्रात हे नवीन नाही, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आता चव्हाट्यावर येत आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा अजून शांत झालेला नाही, तरीही मत चोरीचे आरोप, मित्रपक्षांना डावलण्याचे डावपेच आणि एकमेकांना खाली पाडण्याचे प्रयत्न सातत्याने चर्चेत आहेत. याचं ताजं उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातून समोर आलं आहे.
महायुतीच्या दोन मित्रपक्षांमध्ये आता खडाजंगी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. पण विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी सत्ता काबीज केली. मात्र, या निवडणुकीत महायुतीतल्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तुंबळ युद्ध झालं होतं. आता हे जुने हिशेब स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा उघडे पडले आहेत. अजित दादांच्या आमदाराने थेट भाजपवर हल्ला चढवला आहे.
एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण
भाजपने पाच कोटी रुपये खर्च करून मला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट केला आहे. या आरोपावरून स्थानिक पातळीवर नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. हा वाद आता महायुतीच्या एकजुटीला धक्का देणार आहेत. धर्मराव बाबा आत्राम, अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार, यांनी या वादाला आणखी मसाला लावला आहे. ते म्हणतात, ‘माझ्या मतदारसंघात कोणी किती जागा लढवायच्या आणि कोणाला किती जागा द्यायच्या, हे मी ठरवणार. येत्या निवडणुकीत अहिरे मतदारसंघात फक्त घड्याळच चालेल. हे वक्तव्य इतकं धारदार आहे की, ते महायुतीच्या नेत्यांच्या छातीत धडकी भरवणारं आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘महायुती एकत्र निवडणूक लढेल, एकमेकांना खाली पाडणार नाही.’ दुसरीकडे अजित पवार म्हणतात, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पण आत्रामांच्या या दादागिरीने महायुतीत उभी फूट पडण्याची शक्यता वाढली आहे. हे वाद केवळ शब्दांचे नाहीत, तर ते राजकीय गणिते बदलू शकतात. गडचिरोलीत महायुतीच्या एकजुटीला खिंडार पडलं तर मोठे बदल होणार. महायुती सरकारने स्थानिक निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिले असले तरी, आता हे चित्र बदलताना दिसत आहे. अजित पवारांच्या आमदाराने भाजपला थेट आव्हान दिलं आहे. भाजपला एकही जागा जिंकू देणार नाही असे ते म्हणाले आहे.
गडचिरोलीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आधीच चुरस होती. पण आता हे वाद उघड्या डोळ्यांनी दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारसंघातील जागांचं वाटप कोण करणार? आत्राम म्हणतात, ‘मी ठरवणार‘ हे म्हणजे महायुतीच्या नेत्यांसाठी एक प्रकारची घड्याळाची घंटा आहे. एकीकडे पक्षप्रमुख एकजुटीचे गाणे गात आहेत. पण स्थानिक पातळीवर नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत.
