
Views: 28761
पक्षाकडून मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याची तयारी ठेवणाऱ्या फुके यांनी आपल्या कामाचा वेग कायम ठेवला आहे. पक्ष संघटनावर विश्वास आणि आपल्या कामाची व्याप्ती त्यांनी कायम ठेवल्याचं दिसत आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आमदार डॉ. परिणय फुके हे नाव ‘हेवीवेट’ नेत्यांपैकी एक आहे. राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मिळेल ती जबाबदारी पूर्ण ताकदीनं पार पाडली. महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खांद्याला खांदा लावत त्यांनी काम केलं. भाजपचं संघटन भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं. एवढी मोठी कसरत करीत असताना त्यांनी महायुतीमधील एकाही नेत्याची नाराजी होऊ दिली नाही. सर्वांसोबत खांद्याला खांदा लावत काम केलं.

लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून मिळालेली जबाबदारीही त्यांनी पेलली. त्याचेच फलित म्हणून त्यांना भाजपनं विधान परिषदेवर पुन्हा आमदार म्हणून संधी दिली. पद असलं काय किंवा नसलं काय विनम्रनेते विकासाची कामं कशी करून घ्यायची हे डॉ. फुके यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळं त्यांनी भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील विकास कामं थांबली नाही.
Speed वाढणार
राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. त्यामुळं त्यांच्या विश्वासू टीम मधील अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळेल असं वाटत होतं. यात जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, बडनेऱ्याचे आमदार रवी राणा याचं नाव घेतलं जात होतं. नागपुरातून प्रवीण दटके यांना आणि भंडारा-गोंदियातून डॉ. परिणय फुके यांना संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रथमच अत्यंत वेगळ्या पद्धतीचा प्रयोग राबविला. हा प्रयोग राबवित असताना भाजपमधील वरील नावांपैकी कोणीही आकांत तांडव केला नाही. रवी राणा हे मुळात भाजपमध्ये नसल्यानं त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरही भाजपच्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी अत्यंत परिपक्वतेची भूमिका दाखविली. त्यात आमदार डॉ. परिणय फुके यांचंही नाव घ्यावं लागेल. मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी कुठेही आपण स्पर्धेत आहोत, यासाठी चढाओढ केली नाही. मंत्रिपदावर आपली वर्णी लागावी यासाठी वशिलेबाजी केली नाही. आजपर्यंत फुकेंनी शब्द टाकला अन् फडणवीसांनी तो टाळला असं कधीच झाल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळं डॉ. फुके यांनी इच्छा व्यक्त केली असती तर त्यांना पद मिळालंही असतं. परंतु डॉ. फुके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि निर्णयावर ठाम विश्वास दाखविल्याचं त्यांच्या कृतीतून दिसून आलं.
पद नाही काम बोलतं
पद नव्हे तर काम बोललं पाहिजे असं आमदार डॉ. परिणय फुके यांच्या बाबतीत बोलावं लागेलं. त्यामुळं मंत्रिपदासाठी त्यांनी अट्टाहास केला नाही. पक्ष देईल ती जबाबदारी ते आताही पार पाडत आहेत. पद मिळालं नाही म्हणून ते नाराज किंवा अस्वस्थ झाल्याचं दिसत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीपासूनच ते मतदारसंघात कामात व्यस्त असताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी गोंड-गोवारी समाजाच्या शिष्टमंडळाची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आणली.
नागपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असताना त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. ओबीसी समाजाचा नेता म्हणून त्यांनी त्यांचे प्रश्न सोडविलेच. याशिवाय ओबीसी समाजाच्या मनात महायुती सरकारची ‘इमेज बिल्डिंग’ही केली. हे सगळं डॉ. फुके यांनी पदासाठी केलं असं अजिबातच दिसत नाही. त्यामुळं नागपूर, भंडारा, गोंदियात कमळ फुलविण्यासाठी आमदार डॉ. फुके यांनी केलेल्या प्रयत्नांचं फळ त्यांना नक्की मिळेल. दोन्ही जिल्ह्यातील विकास वेगानं होईल, असंच आता दिसत आहे.