
राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं तरी निवडणुकीचं कवित्व संपलेलं नाही. अद्यापही ईव्हीएम अन् विजयाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आता तर अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर महाविकास आघाडी सरकार ईव्हीएम विरोधात आंदोलन करीत आहे. अनेकांनी आता निवडणुकीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात माजी आमदार चरण वाघमारे यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात त्यांनीउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
भंडारासह महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभा निवडणुकीसंबंधात चर्चा सुरू आहे. अशातच तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राजू कारेमोरे यांचे निवडणुकीला आव्हान दिलं आहे. त्यांनी निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाघमारे म्हणाले की, 2020-21 मध्ये राजू कारेमोरे हे आमदार असताना त्यांनी गैरप्रकार केला आहे.

राजू कारेमोरे यांनी स्वतः आर. के. राइस उद्योग नावाने धान भरडाई करून तांदूळ पुरवठा करण्याचा कंत्राट घेतला. त्यावर मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि राज्य शासनाच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करार केला. करारनाम्यावर या सगळ्यांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्याचा आधार घेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
जाणीवपूर्वक विलंब
तक्रारीची दखल घेत राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविले होते. हे प्रकरणी निवडणुकीपूर्वी निकाली लागले अपेक्षित होते. निर्णय आला असता तर राजू कारेमोरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पात्र ठरले नसते. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर आरोग्य शिबिराचे बिना परवानगी आयोजनही त्यांनी केले. महाप्रसादाचे वितरण केले. किटचे वाटप केले. पैसे वाटपाचेही आरोप त्यांच्या विरोधात असल्याचं चरण वाघमारे म्हणाले.
तुमसर, आंधळगाव, मोहडी, शिहोरा या पोलिस ठाण्यात कारेमोरे यांच्या विरोधात आचारसंहिता उलंघन केल्याप्रकरणी जवळपास 11 गुन्हे दाखल आहेत. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. असे असतानी गोपनीयतेचा भंग करण्यात आला. चरण वाघमारे यांनी तक्रारी केल्याचे लिखित पुरावे निवडणूक विभागाकडून देण्यात आलेत. आयोगाच्या गोपनीयतेचा नियम भंग केल्याचं हे प्रकरण असल्याचंही वाघमारे म्हणाले. राजू कारेमोरे यांना अनेकांनी चुकीच्या पद्धतीनं अधिकाराचा वापर केल्याचंही वाघमारे म्हणाले.
कोरेमोरे यांनी गैर फायदा घेत अनेक ठिकाणी पेड न्यूज दिल्याचा आरोपही चरण वाघमारे यांनी केला. मात्र निवडणूक विभागानं कोणताही कारवाई केलेली नाही. मतमोजणी नंतर पाच बुथच्या व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी आपण केली. त्यासाठी नियमानुसार पैशांची भरणा केली. मात्र त्यानंतरही मोजणी करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही व व्हिडीओ फुटेज दिले नाहीत. प्रशासकीय यंत्रणेकडून दुजाभाव करण्यात आल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. त्यामुळं आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं. वाघमारे यांच्यावतीनं अॅड. अनिरुद्ध चांदेकर, अॅड. संदीप सिंह, अॅड. ऋषीकेश मैडिलवर, अॅड. किशोरी डोंगरवॉर यांनी ही याचिका दाखल केली आहे.